विरोधी पक्षांच्या वतीने २३ आमदारांची नावे आणि केवळ सात जणांच्या सहीचे पत्र देणाऱ्या विरोधकांची संभावना अवसान आणि आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष, अशी करत मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी काल त्यांना नामी सल्ला दिला. मुँह खोलने से पहले सोचना सीखें, अपने गिरोबान में झांकना तो सीखे…

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी काल सालाबादप्रमाणे बहिष्कार टाकला. पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आक्षेपांना उत्तरे देताना मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडक टीका केली. घराबाहेर न पडणारे आता शेतकऱ्यांच्या बांधावर जायची भाषा करत आहेत आणि म्याडमच्या परवानगीविना नाकही खाजवू न शकणारे आमच्यावर दिल्लीसमोर गुडघे टेकल्याची टीका करताहेत, अशी टिप्पणी करून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर लोकांचा मोदी ग्यारन्टीवर विश्वास आहे, हेच दिसून आले आहे.

राज्यातील गुन्हेगारीबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिले. विरोधी पक्षनेत्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवाल कसा वाचावा, याचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे, अशी ते म्हणाले. केवळ गुन्ह्यांचे आकडे न सांगता ते लोकसंख्येच्या प्रमाणात बघणे, इतर राज्यांच्या तुलनेत आपले राज्य नेमके कोठे आहे, हे विरोधी पक्षनेत्यांनी बघितलेले नाही, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यावरील कर्ज वाढले, या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की डेट टू जीडीपी रेशो बघितला जातो. पण विरोधक नुसतेच कर्जाचे आकडे सांगतात. वास्तविक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठी वाढ झालेली आहे आणि केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या मर्यादेतच आपले कर्जाचे प्रमाण आहे. पण, हे लोक मुद्दाम दिशाभूल करत आहेत.