Homeडेली पल्सक्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने...

क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शिका ईशान्येतली भाषा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल  दूरदृश्‍य प्रणालीद्वारे ईशान्येतील सात राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला संबोधित केले. या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आलेल्या प्रत्येकाने ईशान्य भारतातील समृद्ध क्रीडा संस्कृतीचा अनुभव घ्यावाच, पण त्याही पलिकडे जात या प्रदेशाचे सौंदर्यही अनुभवावे. या स्पर्धेनंतर सगळ्यांनी #NorthEastMemories हा हॅशटॅग वापरून साहसी उपक्रम राबवावेत, आठवणी टिपाव्यात आणि नंतर हे अनुभव समाजमाध्यमांवर सर्वांसोबत सामायिक करावेत. या स्पर्धेनिमीत्त या प्रदेशात आपण जो काळ व्यतीत करू त्यावेळात स्थानिक भाषांमधील वाक्येही शिकून घ्यावीत असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे आपली ज्या-ज्या समाजघटकाशी भेट होईल, त्या-त्या समाजघटकाशी आपण जोडले जाऊ, परस्परांच्या सांस्कृतिक अनुभवात भर पडेल. यासाठी आपण भाषिणी  या अॅपचा वापर करावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार केलेल्या फुलपाखराच्या आकारातील अष्टलक्ष्मी, शुभंकराची पंतप्रधान मोदी यांनी नोंद घेतली. ईशान्येकडील राज्यांना नेहमीच अष्टलक्ष्मी असे संबोधणारे पंतप्रधान म्हणाले की, “या खेळांमध्ये फुलपाखराच्या आकारातले शुभंकर बनवणे म्हणजे ईशान्येच्या आकांक्षांना कसे नवीन पंख मिळत आहेत, याचेही प्रतीक आहे.”

अगदी मनापासून खेळावे, निर्भयपणे खेळावे, स्वतःसाठी आणि तुमच्या संघासाठी जिंकावे. मात्र तुम्ही हरलात तरी खचून जाऊ नका. कारण पराभवाचा धक्का ही शिकण्याची एक संधी असते, असे पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण देशभरामध्‍ये सुरू असलेल्या विविध क्रीडा उपक्रमांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ईशान्येतील सध्याच्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, लडाखमधील खेलो इंडिया हिवाळी खेळ, तामिळनाडूमधील खेलो इंडिया युवा खेळ, दीवमधील बीच गेम्स यांचा उल्लेख केला.

खेळांबद्दलच्या बदलत्या सामाजिक धारणेविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पालकांच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे आवर्जून नमूद केले. लक्षात घ्या की, पूर्वी, पालक आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रामध्‍ये काही करण्‍यासाठी पाठवण्‍यास कचरत होते. यामुळे मुलांचे शिक्षणावरील लक्ष विचलित होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. आताच्या बदलत्या काळात आपल्या पाल्यांनी राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अशा कोणत्याही स्तरावर क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा पालकांना अभिमान वाटू लागला असल्याची बदलती मानसिकताही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखीत केली.

क्रीडा

ज्याप्रमाणे आपण मुलांची शैक्षणिक कामगिरी उत्सवाप्रमाणे साजरी करतो, त्याचप्रमाणे खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याची नवी प्रथा आपण घडवली पाहिजे असे ते म्हणाले. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉलपासून अॅथलेटिक्सपर्यंत, बॅडमिंटनपासून बॉक्सिंगपर्यंत, भारोत्तोलनापासून बुद्धिबळापर्यंत सर्व प्रकारांतल्या क्रीडापटूंना प्रेरणा दिली जाते, तिथे खेळ हा उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. ईशान्य भारताच्या या समृद्ध क्रीडा संस्कृतीतून आपण शिकवण घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

देशातील युवावर्गासाठी नव्या संधीची दारे खुली करणारी परिसंस्था देशात विकसित होत आहेत. खेलो इंडिया असो, की टॉप्स वा इतर उपक्रम असोत, आपल्या युवा पिढीसाठी नव्या शक्यता आणि संधीची दारे खुली करणारी एक नवीन परिसंस्था विकसित केली जात आहे. खेळाडूंसाठी प्रशिक्षणाच्या सुविधांपासून ते शिष्यवृत्तीपर्यंत सकारात्कम, पोषक वातावरणाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यंदा क्रीडा क्षेत्रासाठी विक्रमी 3500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली केली असल्याचे ते म्हणाले.

भारताने जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2019 मध्ये आपण केवळ 4 पदके जिंकू शकलो होतो. मात्र 2023मध्ये आपण एकूण 26 पदके जिंकली अशी माहिती त्यांनी दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विक्रमी संख्येने पदके जिंकल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले. खेळाडूंनी जिंकलेली ही पदके म्हणजे केवळ संख्या नाही, तर शास्त्रीय दृष्टिकोन बाळगत आपण आपल्या खेळाडूंना पाठबळ आणि सहकार्य दिलं तर ते काय साध्य करू शकतात याचाच हा पुरावा आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

खेळाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये अनेक मूल्यांची रुजवण होत असते. खेळात यश मिळवण्यासाठी प्राविण्यासोबतच इतर गोष्टींचीही अधिक गरज असते. या यशासाठी संयमी स्वभाव, नेतृत्त्वगुण, सांघिक वृत्ती, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक असते. खेळाडूंनी केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नव्हे, तर जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी खेळांकडे वळावं असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

Continue reading

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...
Skip to content