Homeटॉप स्टोरीनानाच म्हणतात, राज्यात...

नानाच म्हणतात, राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली!

महाराष्ट्रात राजकीय गुन्हेगारी वाढली आहे. वाळूमाफिया ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ट्रकखाली चिरडून मारत आहेत. वकिलांचे खून होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. अशावेळी हे सारे थोपवण्यासाठी काय धोरण आखणार, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच सत्ताधारी पक्षाचे सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

भारतीय जनता पार्टीच्या सीमा हिरे यांनी नाशिकमधले भाजपाचे पदाधिकारी अमोल इगे यांच्या हत्त्येच्या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर झालेल्या चर्चेत पटोले यांनी ही भूमिका घेतल्याने सारे सभागृह अचंबित झाले. यावेळी दिलेल्या उत्तरात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मात्र पटोले यांच्या आरोपाला खोडून काढत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. त्यामुळेच हे राज्य प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते, असे सांगितले.

मृत व्यक्तीने आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवणारे पत्र नाशिक पोलिसांना दिले होते. परंतु त्यांना संरक्षण देण्यात आले नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे आरोपींवर कारवाई करावी म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या आमदारांवर तसेच इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच या खून प्रकरणाच्या षडयंत्रात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरूद्ध ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील आदींनी संबंधित पोलीस आधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तसेच भाजपाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरली. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची तत्परता दाखवणाऱ्या नाशिक पोलिसांनी याप्रकरणी तशी तत्परता का दाखविली नाही, असा सवाल विखे पाटील यांनी केला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढण्याची भीती गणेश नाईक यांनी व्यक्त केली.

चर्चेच्या उत्तरात सतेज पाटील यांनी या प्रकरणातल्या भाजपाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील तसेच मृत व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या पत्रावर का कारवाई केली गेली नाही, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

सगळ्याच पक्षात गुंडांचा भरणा…

राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर वेळोवेळी चर्चा होते. तसेच निवडणुकीचे तिकिट म्हणजेच उमेदवारी देताना फक्त आणि फक्त निवडून येण्याची क्षमता (इलेक्टिव्ह मेरिट) हाच निकष पाळला जातो आणि त्यातूनच हळूहळू राजकारणात बाहुबलींचे प्राबल्य वाढत गेले. बळी तो कान पिळी, हाच सर्वसाधारण राजकीय व्यवहार होऊन बसला. राजकारणाच्य गुन्हेगारीकरणाला सर्व पक्ष जबाबदार आहेत आणि गुंडांचा भरणा केवळ एखाद्या राजकीय पक्षात असतो, असे नाही, ही सर्वसामान्यांची धारणा आहे. पण हीच गोष्ट एखादा आमदार विधानसभेत सांगू लागला तर….

मूळचे शिवसेनेचे, नंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आणि सध्या भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले नवी मुंबईचे बलाढ्य नेते गणेश नाईक यांनीच ही गोष्ट विधानसभेत जाहीरपणे सांगितली. विषय हत्त्येच्या संदर्भातला असल्याने पोलीस संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, ही मागणी करताना गणेश नाईक म्हणाले, कोणत्याही एका पक्षात गुंडांचा भरणा असतो, असे नाही. थोडक्यात, सर्वच पक्षात आता गुंड भरलेले आहेत, हे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content