महाराष्ट्रातल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या तरूणांचे लसीकरण उद्या म्हणजेच १ मेपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री केली. यासाठी लागणाऱ्या लससाठ्याबाबत उत्पादकांशी बोलणे चालू असल्याचे सांगतानाच त्यांनी लसीच्या तीन लाख मात्रा उपलब्ध झाल्याचेही सांगितले. मात्र, उद्यापासून होणारे लसीकरण नेमके कोठे व कधी होणार, यावर त्यांनी मौन पाळले. इतकेच नव्हे तर किमान पहिली लस तरी कुठे व कोणाला दिली जाणार आहे, हेही त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे १ मेपासून तरूणाईचे होणारे लसीकरण केवळ भुलभुलैय्या असण्याचीच शक्यता जास्त आहे, असे मत जनमानसात व्यक्त होत आहे.
गुरूवारीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इच्छा असूनही लससाठ्याअभावी १ मेपासून युवा वर्गाचे लसीकरण आम्ही सुरू करू शकत नसल्याचे सांगितले होते. मात्र, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी उद्यापासूनच लसीकरण सुरू होत असल्याचे समाजमाध्यमातून जनतेला संबोधित करताना जाहीर केले. त्यात त्यांनी लसीकरणाबद्दल वेगवेगळी परस्परविरोधी वक्तव्ये करून निव्वळ संभ्रम निर्माण केल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
राज्यातल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या साधारण ६ कोटी नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून म्हणजेच १ मेपासून सुरूवात होणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र सरकार लसपुरवठा करणार आहे. परंतु त्याखालील नागरिकांची जबाबदारी केंद्राने राज्यांवर टाकली आहे. आम्ही ती स्वीकारली आहे. सहा कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी दोन डोसप्रमाणे १२ कोटी लसी लागतील. त्या विकत घेण्यासाठी एकरकमी चेक द्यायला आम्ही तयार आहोत. पण, उत्पादकांच्या मर्यादा आहेत. सध्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोनच कंपन्या लस उत्पादन करत आहेत. त्यांच्याशी आमचे बोलणे चालू आहे. स्पुटनिक लस येणार म्हणतात, त्यांच्याशीही बोलणे चालू आहे. कोणत्याही बाबतीत आम्ही मागे राहिलेलो नाही. आर्थिक चणचण असतानाही एकरकमी पैसे द्यायला आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले.

त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी, आम्हाला आज तीन लाख लसींचा साठा मिळाला आहे. आणखी १८ लाख लसी मे महिन्यात मिळणार आहेत. पण तारीख मिळालेली नाही. जसजसा लसींचा पुरवठा होईल त्याप्रमाणे लसीकरण होत राहील. पण कोणी कोणत्याही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. यासाठी जे एप आहे त्यावर कोठे व कधी लस मिळेल हे कळवले जाईल. त्यावेळी तेथे जाऊन लस घ्या. केंद्रांबाहेर गर्दी करू नये. नाहीतर ही केंद्रेच कोविड प्रसारक मंडळे होतील का, अशी भीती वाटते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्यापासून होणारे युवा वर्गाचे लसीकरण नेमके कोणाचे होणार हे गुलदस्त्यात राहिले, असे बोलले जाते.
केंद्र सरकारने या नोंदणीसाठी असलेले कोविन एप व्यवस्थित चालू असल्याचे गुरूवारीच स्पष्ट केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबोधनात हे एप क्रॅश झाल्याचे सांगत असे होऊ शकते, अशी पुस्तीही जोडली. आणखी काही दिवस असे होईल, असे सांगत त्यांनी तरूणाईच्या लसीकरणाला लागणाऱ्या विलंबाचे खापर पुन्हा केंद्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याचे जाणकारांना जाणवले. कोविन एप क्रॅश होऊ नये म्हणून प्रत्येक राज्याला त्यांचे स्वतंत्र एप तयार करायला परवानगी द्यावी आणि हे एप मग मुख्य एपशी जोडण्यात यावे, अशी सूचना आपण पंतप्रधानांना करणार आहोत, असे सांगत पुन्हा त्यांनी यानिमित्ताने वेळ घेण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जाते.
याच संबोधनात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही दिवसाला १० लाखांचे लसीकरण करू शकतो. पण, यासाठी लस पुरवठा व्हायला हवा. केंद्र सरकारने आम्हाला जास्तीतजास्त लसपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे उद्यापासून तरूणांच्या लसीकरणासाठी वापरला जाणारा साठा नेमका कोणता आहे, ४५ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींसाठी केंद्राकडून पाठवला जाणारा साठा तरूणांसाठी तर वापरला जाणार नाही ना, अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली.

