Homeटॉप स्टोरीविधिमंडळात आजही गदारोळ?

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता असून यामुळे पुन्हा सभागृहात गदारोळ पाहयला मिळू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

मंगळवारी सकाळी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर नाना पटोले बोलण्यासाठी उभे राहिले. या सरकारमधील कृषीमंत्री तसेच इतर नेत्यांनी वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. सभागृह नियमानुसार चालवले जाईल, असे स्पष्ट करत अध्यक्ष नार्वेकर यांनी पटोले यांना जागेवर बसण्यास सांगितले. पण, पटोले यांनी प्रक्षुब्ध होत जागेकडे न जाता अध्यक्षांच्या दिशेने सभागृहातील हौद्यात जात विरोधी पक्षांतील सदस्यांना हौद्यात या, असे खुणावले. विरोधी पक्षांचे विशेषतः काँग्रेसचे अनेक आमदार सभागृहातील हौद्यात जमून निदर्शने करू लागले, घोषणा देऊ लागले. त्यावेळी पटोले यांनी राजदंडाला हात घालताच अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करत असल्याची घोषणा १२ वाजून तीन मिनिटांनी केली.

विधिमंडळ

त्यानंतर १२ वाजून आठ मिनिटांनी कामकाज सुरू होताच सर्व विरोधी सदस्यांनी शेतकऱ्यांची माफी मागा, अशा घोषणा सुरू केल्या. त्यावर नाना तुमच्याकडून या वर्तनाची अपेक्षा नाही कारण तुम्ही सभागृहाचे अध्यक्ष राहिलेले आहात. त्यामुळे तुम्ही राजदंडाला स्पर्श केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई करण्यासाठी मला भाग पाडू नका, जागेवर बसा, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावले. त्यानंतरही विरोधक घोषणा देत राहिले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली. फडणवीस म्हणाले की, वास्तविक पटोले विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले सदस्य आहेत आणि त्यांनी अध्यक्षांच्या दिशेने त्यांच्या अंगावर धावून जाणे, राजदंडाला स्पर्श करणे आणि जणू काही अध्यक्षच दोषी आहेत, या पद्धतीने वागणे चुकीचे आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले. त्यानंतर विरोधकांनी दिवसभरासाठी सभात्याग केला आणि सरकारकडून कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नाना पटोले यांच्या निलंबनावर सत्ताधारी आणि विरोधक यांची भिन्न भूमिका आहे. सत्ताधारी भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पटोले यांचे वर्तन चुकीचे ठरवत माफीची मागणी केली, तर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पटोले यांचे समर्थन करत निलंबनाचा निषेध केला. असंसदीय भाषा वापरल्यामुळे पटोले यांना निलंबित केले गेल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. दुसरीकडे पटोले यांनीही आपली भूमिका ठाम ठेवत, शेतकऱ्यांचा अपमान झाला तर मी शांत बसणार नाही असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विधिमंडळ

सत्ताधारी-विरोधक संघर्षातील ठळक मुद्दे:

1. कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या ‘अपमानास्पद’ विधानाचा विरोधकांनी निषेध केला.

2. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली.

3. गोंधळानंतर नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.

4. विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले.

5. काँग्रेसने कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content