Homeटॉप स्टोरीछत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेबद्दल...

छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेबद्दल १०० वेळा माफी मागणार!

छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे त्यांचा राजकोटमधला पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेबद्दल मी एकदा नव्हे तर शंभरवेळा माफी मागायला तयार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबईत आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काल रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदूर्गमध्ये झालेल्या पुतळा दुर्घटनेवर चर्चा झाली. ही खरेतर खूप वेदनादायी घटना आहे. नौदलाकडून महाराजांचा पुतळा बनवला गेला होता. काल झालेल्या बैठकीला सरकारमधील मंत्री तसेच नोदल व पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी संयुक्त समिती

दरम्यान, मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्त्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक वेगळी समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा येथे बोलावलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.

छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समितीदेखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content