मुंबईतील एका आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्राने शहरातील शाळांच्या आसपासचे गर्दीचे, घाणीचे, अरुंद रस्त्यांचे, कित्येक दिवस न उचललेल्या राबीटचा विद्यार्थ्यांना कसा त्रास होत आहें आणि यंत्रणा कशा ‘हाताची घडी..’ बसल्या आहेत यांचे वास्तव दर्शन घडवले. असे करताना त्यांनी राबीट न उचलण्याचा दोष मात्र वाहतूक पोलिसांच्या माथी मारला आहे. तो मात्र सर्वार्थाने चुकीचा व काहीसा अन्यायकारक आहे. खरंतर राबीट उचलण्याशी वाहतूक पोलिसांचा काहीही संबंध नाही आणि ज्या शाळेसमोर ते राबीट पडले आहे त्या शाळेचे प्रशासन काय झोपा काढत आहे का? त्यांनी त्याचा पाठपुरावा नको का करायला? तसेच आता महापालिका निवडणुकांचा मोसम आहे. ‘आपल्या घरातला माणूस’, ‘हक्काचा माणूस’, ‘कार्यसम्राट’, ‘भाग्याचा तारणहार’ अशी अनेक बिरूदावल्या मिरवणारे कुठल्या बिळात लपलेले आहेत हे मात्र या इंग्रजी पेपरने विचारलेले नाही! मूठ नसलेल्या तलवारीने वार करताच येत नाही, हे या इंग्रजीभक्तांना कळेल तो सुदिन!
खरंतर एकट्या मुंबई शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच कानिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरातील ही जीवघेणी परिस्थिती नाही तर मुंबई विभागीय प्राधिकरणात (हल्लीचं एमएमआर) कमिअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. आमच्या ठाणे शहरात तर नामांकित शाळांच्या आजूबाजूच्या परिसरात शाळा भरते तेव्हा व सुटते तेव्हा जाऊन बघण्यासाखी परिस्थिती असते. बड्या घरच्या विद्यार्थ्यांसाठी आलेल्या मोटारगाड्या कशाप्रकारे उभ्या केल्या जातात, रिक्षा कशा उभ्या केलेल्या असतात, शाळेच्या सुरक्षारक्षसकाला कसे कुणी भीक घालत नाही यांचे लाईव्ह चित्रण पाहावयास मिळेल! सरकारची काय चूक झाली, पोलिसांनी खरंतर अजून नीट वागलं पाहिजे, अशी शेरेबाजी करणारे पालक कशी बोगसरित्या गाडी पार्क करतात हे पाहण्यासाखे असते. बाईकस्वार तर नेहमीच पार्श्वभाग वाकडा करून बाईक उभी करत असतात. बरे.. त्या एकदोन असतील तर ठीक, पण सुमारे १०/१५ बाईक्स अशा वाकड्या उभ्या करून वाहतुकीची ऐशीतैशी करणाऱ्यांना काय आणि किती सांगणार? अनेक शाळांच्या समोरून मोठे रस्ते जातात. साहजिकच शहरातील बससेवाही तेथूनच जात असते. सर्वांची खोटी करणारी ही पालक मंडळी थोडातरी बिचार करतील की नाही?

मुंबईत आणि ठाणे-कल्याण परिसरात सर्वत्र वाहतूककोंडीने विद्यार्थ्यांचे प्राण कंठाशी आणले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुंबई व ठाणे परिसरात स्कूलबसनेही विद्यार्थ्यांना सुमारे दोन-अडीच तास प्रवास करायला लागतो आणि हे दररोज करावे लागते. दोन-अडीच तास प्रवास, नंतर अगदी थोडी विश्रांती, नंतर लगेच शिकवणी वा क्लास, घरी आल्यावर गृहपाठ, विद्यार्थ्यांचा अगदी पिट्टा पडतो. तो इतर ठिकाणी काय पाहणार, हा प्रश्नच शिल्लक उरतो. या इंग्रजी पेपरच्या म्हणण्याप्रमाणे, मुंबई परिसरातील शाळांच्या आसपासचे वातावरण एकदम बकवास आहे. हे मान्यच करावे लागेल. पूर्व उपनगरातील लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग असो वा पश्चिमेतील एसव्ही रोड, सकाळपासून हे दोन्ही मार्ग दुथडी भरून वाहनांनी भरून असतात. शाळांच्या आसपासच्या परिसरात शिस्त लावण्याचे काम काय फक्त एकट्या पोलिसांचे आहे? इतर वेळा कुठलंही आंदोलन करण्यासाठी घसा सुकवणारे समाजसेवक, माहिती अधिकारवाले कार्यकर्ते, गृहरक्षक दल, एनसीसीचे कॅडेट, हे कोणीच कसे शाळा परिसरात दिसत नाहीत? की ही सर्व मंडळी सरकारला विरोध करण्यासाठीच रस्त्यावर उतरतात?
महापालिका आणि पोलिस यंत्रणेचेच हें काम आहे, आपण फक्त पाहणार ही वृत्ती नागरिकांनीही सोडायला हवी. येत्या महिनाभरातच मुंबई, ठाणे परिसरात महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आम्हाला तुमचे चिकनेचुपडे जाहीरनामे नकोत. “It’s time to start bringing the congregation down to the city hall and the Mayors, the city council and school boards. What’s the plan? What is the local government to do for us” असे स्पष्ट विचारण्याची वेळ आली आहे. वायद्याची ‘गाजरं’ बरीच पाहिली. आता आमच्याकडे वेळ नाही. शहर सुसह्य होणार की नाही, इतकेच सांगा, बाकीचा फाफटपसारा नको! आम्हाला रोकड नको, रोकडं काम मात्र हवंय!

