नागपूरमधल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.., फिरसे जीतेंगे हिन्दुस्थान… अशा घोषणा देत विधानसभा दणाणून टाकली आणि चार राज्यांच्या विधानसभांच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभेतही दिसून आले.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या इमारतीच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. गळ्यात संत्र्याचे हार घालून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य पायऱ्यांपाशी आले. हातात घोषणांचे फलक घेत त्यांनी घोषणा दिल्या आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. त्यावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतल्या घोषणाबाजीचा उतारा दिला.

विरोधी पक्षांनी याच विषयावर स्धगन प्रस्ताव दिला होता. पण, तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा विषय उपस्थित करत राज्य सरकारने दुष्काळसदृश असा नवाच शब्दप्रयोग वापरला आहे, याकडे लक्ष वेधले. अवकाळी पावसासह विविध आपत्तींमुळे २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. पंचनामे केले जात नाहीत, याकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांना सरसकट भरपाई दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

त्यावर अवकाळी पावसासह गारपीट तसेच चक्रीवादळासह कोणत्याही प्रकारची आपत्ती असेल तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील आणि त्यांना नुकसानभरपाई देईल, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे आणि यंदा पहिल्यांदाच २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा केली आहे. गेल्या वर्षी एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट भरपाई दिली होती आणि यंदा भरपाई देताना २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरची अट केली आहे, हे फडणवीस यांनी सांगताच सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.