Homeकल्चर +पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या...

पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिल्लीच्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात पिप्रहवा अवशेष आणि मौल्यवान रत्न-अवशेष यांचे ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे अवशेष अलीकडेच भारतात परत आणण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. यानिमित्ताने 127 वर्षांनंतर भारतात परत आणण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या पिप्रहवा येथील रत्न-अवशेषांचे, पिप्रहवा स्थळावरील 1898 तसेच 1971 ते 1975 या कालावधीत झालेल्या उत्खननांत प्राप्त झालेल्या अवशेष, रत्न-अवशेष आणि अवशेष-पेटिकांचे पुन्हा एकत्रिकरण होत आहे.

‘द लाइट अँड द लोटस : रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात, सांकृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखालील विविध सांस्कृतिक संस्थांकडील संबंधित पुरातन अवशेष व कलाकृती विषयानुरूप पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत. या अवशेषांमध्ये भगवान बुद्धांशी संबंधित आतापर्यंतचे सर्वात व्यापक संकलन आहे. खोल तत्त्वज्ञानात्मक अर्थ, उत्कृष्ट कारागिरी आणि जागतिक आध्यात्मिक महत्त्वाचे ते प्रतीक आहेत. या प्रदर्शनात इ.स.पू. सहाव्या शतकापासून आजपर्यंतच्या कालखंडातील शिल्पकला, हस्तलिखितं, थांग्का चित्रे तसेच विधीपर वस्तूंसह 80हून अधिक वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

जुलै 2025मध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्रालयाने अवशेषांचे यशस्वी पुनर्प्राप्तीकरण केल्याच्या स्मरणार्थ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रयत्नात हाँगकाँग येथील सोथबीज संस्थेमध्ये प्रस्तावित असलेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. 1898मधल्या उत्खननानंतर पहिल्यांदाच, या प्रदर्शनात पुढील घटक एकत्रितपणे सादर करण्यात येत आहेत.

• 1898मध्ये कपिलवस्तू येथील उत्खननातून प्राप्त झालेले अवशेष

• 1972मध्ये करण्यात आलेल्या उत्खननांतून मिळालेले मौल्यवान पुरातन अवशेष

• भारतीय संग्रहालय, कोलकाता येथील अवशेष-पेटिका आणि रत्नजडित मौल्यवान वस्तू

• अलीकडेच पेप्पे कुटुंबाच्या संग्रहातून भारतात परत आणलेले अवशेष (रत्न-अवशेष व अवशेष-पेटिका सापडल्या होत्या ती अखंड दगडी संदूक)

1898मध्ये विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी कपिलवस्तू येथील प्राचीन स्तूपात भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष शोधून काढले. या शोधानंतर या अवशेषांचे काही भाग जगभर वितरित करण्यात आले. त्यापैकी एक भाग सायामच्या (थायलंड) राजाला अर्पण करण्यात आला. दुसरा भाग इंग्लंडला नेण्यात आला, तर तिसरा भाग कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात जतन करण्यात आला. 2025मध्ये पेप्पे कुटुंबाकडे असलेला अवशेषांचा भाग भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे भारतात परत आणण्यात आला.

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content