संगीतनाटकांची परंपरा कायम ठेवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने उद्यापासून म्हणजेच १० ते १२ एप्रिल, या कालावधीत तीन दिवसांच्या संगीतनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात या नाटकांचे दररोज सायंकाळी ५.३० वाजता सादरीकरण होईल.
शुक्रवारी, १० एप्रिलला ‘संगीत शांतीब्रह्म’ हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर जोशी दिग्दर्शित नाटक सादर होईल. संगीत दिग्दर्शन विजय रानडे यांचे आहे तर तबल्यावरील साथ हेरंब जोगळेकर करतील. यात स्मिता करंदीकर, श्रीनिवास जोशी, श्रीकांत भाटवडेकर, मंदार गोखले हे कलाकार कला सादर करतील. शनिवारी, ११ एप्रिलला ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ हे परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे निर्मित आणि कै. विद्याधर गोखले लिखित, घनःश्याम जोशी दिग्दर्शित नाटक सादर होईल. संगीत नीळकंठ अभ्यंकर यांचे तर संगीत दिग्दर्शन विशारद गुरव यांचे आहे. यात देवश्री शहाणे, विपुल निमकर, राधा टिकेकर, ओमकार मोघे, गुरुप्रसाद आचार्य, वल्लरी मोघे, विरेंद्र जोशी, सर्वेश निमकर, प्रशांत आचार्य यांनी अभिनय केला आहे.
संगीतनाट्य महोत्सवाचा समारोप रविवारी, १२ एप्रिलला श्री विजयदुर्ग सांस्कृतिक मंडळ, फोंडा-गोवा निर्मित `संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने होईल. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित आणि कमलाक्ष खेडेकर, शिवप्रणव अळवणी दिग्दर्शित नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत आहे. तबल्यावर शशांक उपाध्ये आणि ऑर्गनवर अनय घाटे यांची साथ असेल. यातील कलाकार विद्या शिकेरकर, वेदश्र बोरकर, पुष्पा गावकर, मेघा गोब्रे, दिव्या मावजेकर, सावनी दांडेकर, ईशा घाटे, स्वरा शिरोडकर, सौम्या शिरोडकर, मुग्धा गावकर, प्राची जठार हे आहेत.
संगीत नाटकांसाठी दैनंदिन प्रवेशिका केंद्राच्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ७७००९९४४९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

