आपल्याला राज्यात सामाजिक सलोखा राखायचा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. प्रक्षोभक भाषणांना बळी पडू नका. वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. त्यांना महत्त्व देऊ नका. आपल्याला विकासाला महत्त्व द्यायचे आहे. एक सुसंस्कृत चेहरा आपल्याला राज्याला द्यायचा आहे. वंचित, दुर्बलांचा विचार करणारा आपला पक्ष आहे, याची जाणीव ठेवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातल्या महिलांना सावध केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘निर्धार नारी शक्तीचा’ हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते.

आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही जिजाऊ… सावित्रीबाईच्या लेकी आहात… छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य तयार केले तर सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. यांची प्रेरणा घेऊन नवीन मुलींना… तरुण पिढीला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.

प्रत्येक क्षेत्रात निर्विवाद महिला पुढे आल्या आहेत. आता ५० टक्क्यापेक्षा जास्त महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत आहेत. आज पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर सरस काम करतात. राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्याचे महिला धोरण सादर करत असताना कोणत्याही त्रुटी त्यामध्ये राहता कामा नये असे काम महिला धोरण आणताना अदिती तटकरे केले आहे. महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे, यासाठी कायदा केला त्याला राष्ट्रपतींची अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यासाठी अदिती आपल्याला दिल्लीला जावे लागेल. त्यांना पटवून सांगावे लागेल. तेही काम करुया, असे ते म्हणाले.

आपल्याला तिसर्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. महिलांनी जास्तीतजास्त मतदान केल्यामुळे पाच राज्यांत भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे येणाऱ्या महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यापध्दतीने कामाला लागा. फेब्रुवारीनंतर आचारसंहिता लागेल असेही अजितदादांनी सांगितले.

घड्याळाची टिकटिक घराघरात वाजवा – सुनिल तटकरे
आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. आज अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली महिलांची प्रचंड शक्ती उभी राहिली आहे हे यश भविष्यात असेच कायम मिळेल. दादांच्या नेतृत्त्वाखाली जो निर्धार केला आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर उभी केली. तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार इथे रुजवण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

पाऊल तर टाकावे लागेल – छगन भुजबळ
निर्धार माँ जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचा केला. निर्धार सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा केला. अहिल्यादेवी होळकरांनी केला. निर्धार रमाबाईंनी केला. निर्धार रकमाबाई राऊत यांनी केला. ठीक आहे तुम्हाला तेवढं मोठं होता येणार नाही. मात्र पाऊल तर टाकावे लागेल, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.