Homeकल्चर +इंदिराजींच्या वानर सेनेआधी...

इंदिराजींच्या वानर सेनेआधी उषाबेन महेता यांची मांजर सेना!

मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक उपक्रम राबवले. इंदिरा गांधी यांची वानर सेना स्थापन होण्याच्याही आधी, उषाबेन मेहता यांनी मुंबईत मांजर सेना सुरू केली होती. या सेनेकडे ब्रिटिश पोलीस आणि सैन्याला त्रास देण्याची, त्यांना हैराण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानी रोहिणी गवाणकर यांनी दिली.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील, स्वातंत्र्यलढ्यात 1930 ते 1940 या दशकात, मुंबईतील महिलांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे खूप कौतुक केले होते आणि त्यांचेही योगदान संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल, असे म्हटले होते, अशी आठवणही या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानींनी सांगितली. पीआयबी मुंबईने आयोजित केलेल्या, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईचे योगदान’ या विषयावरील वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

नेतृत्त्वहीन झालेली चळवळ महिलांमुळे जिवंत

स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या टप्प्यात, सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यास कोणीही उरले नव्हते, अशावेळी, मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी ही चळवळ जिवंत ठेवली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईतील अनेक शूर महिलांनी भाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना सश्रम करावासाची शिक्षादेखील भोगावी लागली होती. मुंबईतल्या पारसी महिला, मादाम कामा यांनी एकटीने जर्मनीत भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवत संपूर्ण देशाला राष्ट्रध्वज फडकावण्याची प्रेरणा दिली होती. दादाभाई नौरोजी यांची नात पेरिन कॅप्टन आणि त्यांच्या दोन भगिनींनी मुंबईत दारोदारी जाऊन खादीचा प्रचार आणि विक्री केली होती आणि ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले होते, अशा प्रेरक आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

गुप्त निरोप पोहोचविणेही फार मोठे काम

रोहिणी गवाणकर यांनी, स्वातंत्र्यलढ्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दलही माहिती दिली. माझ्या एक भावाला तुरुंगवास आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागली होती. दुसऱ्या भावाने पत्री (प्रति) सरकार आंदोलनात भाग घेतला होता. त्यावेळी मी 14 वर्षांची होते. मी सगळ्या लहान मुलांना गोळा करत असे आणि आम्ही सगळे उच्चरवात देशभक्तीची गीते गात असू. पत्री सरकारच्या आंदोलनात मी गुप्त निरोप पोहोचवण्याचेही काम केले होते, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, माहिती आणि प्रसारण मंत्रालय साजरा करत असलेल्या ‘आयकॉनिक विक’चा भाग म्हणून पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक जनसंपर्क विभागातर्फे हे वेबिनार आयोजित करण्यात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आधी होती भारतीय राष्ट्रीय संघटना

या वेबिनारमध्ये बोलताना, इतिहासाच्या अभ्यासक आणि निवृत्त प्राध्यापक अनुराधा रानडे यांनी सांगितले की, 1757 ते 1857 या शतकात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात, 300पेक्षा अधिक छोटेमोठे उठाव या देशात करण्यात आले होते. या लढ्यातली मुंबईची भूमिका विशद करताना त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या योगदानाविषयी सांगितले.

ब्रिटिशांच्या विभाजनवादी आणि अन्याय्य धोरणांना प्रतिकार करण्यासाठी देशाच्या अनेक भागात, अनेक संघटना स्थापन झाल्या होत्या. त्यापैकी एक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसीएशन, 1885 साली स्थापन करण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मूळ नाव, भारतीय राष्ट्रीय संघटना असे होते. मात्र, या संघटनेच्या मुंबईत 1885 साली झालेल्या अधिवेशात, तिचे नाव, इंडियन नॅशनल काँग्रेस असे करण्यात आले. मुंबईतील तेजपाल सभागृहात हे अधिवेशन झाले होते. यात एकूण 72 जण सहभागी झाले होते. त्यातले 18 जण मुंबईतील होते. मुंबई भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होते आणि दक्षिण मुंबईत ब्रिटिशांच्या धोरणांविरोधात अनेक आंदोलने त्यावेळी करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

महालक्ष्मी आणि चौपाटीवर झाला होता मिठाचा सत्याग्रह

अभ्यासक आणि राज्यशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापक अरुणा पेंडसेही या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतल्या स्थानिक नागरिकांनी कसा सहभाग घेतला होता, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

त्यावेळी मुंबईकरांनी महालक्ष्मी आणि चौपाटी इथे मिठाचा सत्याग्रह केला. 1942च्या लढ्यातील घटनांनी मुंबईचे बहुरंगी, बहुसांस्कृतिक एकजिनसी स्वरूप सर्वांना दिसले. महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली गुजराती व्यापाऱ्यांनीही या स्वातंत्र्यलढ्यात पूर्ण सहभाग घेतला होता. मराठी लोकही यात सहभागी झाले होते. व्यापक प्रमाणात राजकीय मोर्चाची सुरुवात त्यावेळी पहिल्यांदा गोवालिया टॅंक म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानापासूनच झाली होती. इथेच आठ ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला होता. त्यानंतर, शिवाजी पार्क आणि इतर ठिकाणी अनेक मोर्चे, रॅली निघाल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफअली आणि उषा मेहता यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली. या लढ्याचे केंद्र मुंबईच राहिली आणि इथूनच हा लढा इतर प्रांतात पसरला, असे पेंडसे यांनी सांगितले.

पत्र सूचना कार्यालयातील सहाय्यक संचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले तर प्रदर्शनाच्या सहाय्यक आरओबी शिल्पा नीलकंठ यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले. माहिती सहाय्यक सोनल तुपे यांनी आभारप्रदर्शन केले.

हा  संपूर्ण वेबिनार https://youtu.be/pVnITlGLAF4 या लिंकवर बघता येईल.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग...

डिजिटल लॉकर सुविधा असलेली ॲक्सिस बँकेची पहिली शाखा कार्यरत

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नवी दिल्लीतल्या कॅपिटल ग्रीन, डीएलएफ मिडटाउन प्लाझा येथे डिजिटल लॉकर सेवांवर लक्षकेंद्रित करणारी आपली पहिली शाखा नुकतीच सुरू केली. प्रगत स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन), उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था आणि अत्याधुनिक लॉकर सेवांच्या...
Skip to content