Homeमाय व्हॉईसमर्जीतला महासंचालक आणण्यासाठी...

मर्जीतला महासंचालक आणण्यासाठी इतकी घाई? 

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचा शासकीय आदेश पाहून जरा आश्चर्यच वाटले. आश्चर्य नेमणुकीबाबत वाटले नाही. कारण राज्य सरकारच्या मर्जीतील वरिष्ठ अधिकाऱ्याची तेथे नेमणूक करण्यात येईल असे वाटत होतेच. त्यात काही नवीन नाही. आश्चर्य अशासाठी वाटले की, थेट सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून नवीन महासंचालकासाठी पायघड्या घालण्याचा हा प्रयत्न आहे, अशी शंका घेण्यास जागा आहे. पोलीस महासंचालकांची कारकीर्द किमान दोन वर्षांची असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलेले आहे. मग सेठ निवृत्त होण्यास अजून तब्बल तीन महिन्यांचा कालावधी असताना इतकी राजकीय घाई का केली जात आहे, हे एक मुख्यमंत्री वा दोन उपमुख्यमंत्रीच जाणो!!

आता घेतलेला निर्णय बदलता येत नसल्याने शब्दांची चलाखी करून आमचा निर्णय योग्यच होता, हे सांगितले जाईलच. सेठ यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आमचा नाईलाज झाला, असेही सांगितले जाईल. पण एका स्वेच्छानिवृत्तीतून दुसरे शासकीय पद कसे देता येते, हा तुमच्या-आमच्यासारख्या सामान्यांना पडणारा प्रश्न सरकारी विधि खात्याला मुळीच पडणार नाही. परंतु न्यायाल्याला मात्र नक्कीच पडेल. सर्वोच्च न्यायालयातील रिट अर्ज क्रमांक 310/1996 प्रकाश सिंग विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा निकाल 2006मध्ये देताना सरन्यायाधीश वाय के सभारवाल यांनी पोलीस महासंचालकपदाची कारकीर्द ही किमान दोन वर्षांची असलीच पाहिजे, असे स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे. इतकेच नव्हे तर महासंचालकांची निवृत्ती लक्षात घेऊनच किमान दोन वर्षे कारकीर्द ठेवलीच पाहिजे, असे ठणकावले आहे.

आता इतके स्पष्ट शब्द असताना सेठ यांना तीन महिने आधी कसे सोडले, असा प्रश्न उपस्थित होतोच. सेठ यांना जर वैयक्तिक कारणासाठी वा वैद्यकीय कारणास्तव निवृत्त व्हायचे असते तर प्रश्न वेगळा होता. मात्र शासकीय सेवेत पुन्हा येण्यासाठी किंवा दुसऱ्या कुणाची तरी मागील दाराने वर्णी लावण्यासाठी असे करणे योग्य ठरणार नाही. याचा साधा विचारही कोणा अधिकाऱ्याने केला नाही याचा खेद वाटतो. रजनीश सेठ यांची वर्णी राज्य लोकसेवा आयोगात लागल्याने आसपसूकच पोलीस महासंचालकपद रिक्त झाले आहे. ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला या सध्यातरी प्रबळ दावेदार दिसत आहेत. त्यानंतर विवेक फणसाळकर यांचेही नाव घेतले जात आहे. राजकीय गणिते पाहता रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच शुक्ला मॅडम यांनी सत्ताधाऱ्यांची आवर्जून घेतलेली भेट सर्वांच्याच लक्षात आहे. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या फोन टेप प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. इतकेच नव्हे तर नव्या सरकारने ही फाईलच बंद केली. सरकारच्या हाती अनिर्बंध सत्ता आहे. त्यामुळे ते काहीही करू शकतात हे जरी खरे असले तरी विरोधी बाकांवर असताना फोन टेपप्रकरणी तांडव करायचे आणि चौकशीअंती ते प्रकरण फुssस ठरले असता पवित्रा बदलायचा, हे राजकारण झाले.

समजा टेपप्रकरण बंदच करायचे आहे, मग ज्या अधिकाऱ्यांनी शपथपूर्व रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध आरोप केले, सेवेत असताना माफीचे साक्षीदार झाले, वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध बोलले, या सर्व बाबी हवेत झाल्या काय? जर मॅडम यांना क्लीन चिट मिळते तर मग वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध आरोप करणाऱ्यावर काही कारवाई होणार की नाही? की राज्य पोलीस दलात आता नवा पायंडा पडणार आहे? विरोधी पक्षात असताना आरोप करायचे व सत्तेत आले की माफ करायचे! शिवाय हे फोन टेप करायला कोणी सांगितले हे तर अजूनही ‘गुप्त’च आहे. असे एकूण बॅकग्राउंड असताना अजून वरची जागा मिळाली की मग काय कुणाची परवानगी असो वा नसो टॅपिंग काय, आणखी काहीही करता येते. हा गंड वाढीस लागणे राज्य म्हणून निश्चितच धोकादायक आहे!!

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content