Homeडेली पल्स‘वर्षा’वरच्या चहात सोन्याचे...

‘वर्षा’वरच्या चहात सोन्याचे पाणी घालतात का?

गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या चहापानावर दोन कोटी 38 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. वर्षावर देण्यात येणाऱ्या चहामध्ये सोन्याचे पाणी घालून देतात की काय, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईच्या विधानभवनात उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापानासाठी निमंत्रित केले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत विधानभवनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक झाली. रायपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित असल्यामुळे काँग्रेसचे नेते या बैठकीला हजर राहू शकले नाहीत. त्यांनी दूरध्वनीवरून बैठकीतल्या निर्णयांना पाठिंबा जाहीर केला. या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या वतीने अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

गेल्या आठ महिन्यांत जाहिरातींवर पन्नास कोटींची उधळण करण्यात आली. याशिवाय मुंबई महापालिकेने जाहिरातींवर सतरा कोटी रुपये खर्च केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे हसरे फोटो दाखवण्यासाठी ही उधळण कशासाठी? आज एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. शेतकऱ्यांना जाहीर केलेले सहाय्य मिळालेले नाही. लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत. धनगरांचे आरक्षण अजूनही बोंबललेलेच आहे, अशी टीकाही विरोधी पक्षनेत्यांनी केली.

गेल्या आठ महिन्यांत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुमार कामगिरी पाहता, महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी त्यांची कामगिरी पाहता या नामधारी, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानाला उपस्थित राहून आम्ही जनतेची प्रतारणा होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत आम्ही विधिमंडळाच्या मागच्या अधिवेशनात सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांची सध्याची स्थिती काय आहे, त्यांची कितपत पूर्तता झाली आहे याचा आढावा घेतला. कांदा उत्पादकांची सध्याची स्थिती पाहता कांदा निर्यातीच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती फार गंभीर झाली आहे. आमदार प्रज्ञा सातव यांना मारहाण झाली. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी मिळाली. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे आरोप होत आहेत. हे सर्व बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे द्योतक का नाही का, असा सवाल त्यांनी केला.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच पक्ष चिन्ह शिंदे गटाला देऊन पक्षपातीपणा केला असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार दुसरीकडे गेले म्हणून काय मनसे त्यांना देणार काय? राज्य सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे, अशी भावना लोकांमध्ये आहे. आम्ही महाविकास आघाडीतले सर्व घटकपक्ष यावेळी एकजुटीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content