Details
युतीची नूरा कुस्ती!
25-Dec-2018
| 1
”
विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
लोकसभेची निवडणूक जवळ येत असताना हिवाळी वातावरणातही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमधील तणाव वाढत आहे. राजकीय वातावरण तापत आहे. हिंदी पट्टयातील भाजपाला हातातील तीन राज्ये गमवावी लागली. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीतही मोदी सरकारच पुन्हा येईल, अशी स्वप्ने पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचे अवसान गळाले आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा पार पडला. मात्र नेहमीप्रमाणे त्यांचा आक्रमकपणा यावेळी दिसलाच नाही. चेहरा चिंताग्रस्त होता. असो.
पंतप्रधान मोदी दिल्लीत परतल्यावर शाह यांनी मंगळवारी रात्री उशिरा कोणताही गाजावाजा न करता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी युतीबाबत बोलणी केली. त्यानंतर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. मात्र शाह यांनी युतीचे संकेत दिले. सेनेला सांभाळून घ्या, दुखवू नका, असा सल्ला भाजपाच्या नेत्यांना दिला. ‘तर निर्णय आम्हीच घेऊ’ अशी अरोळी ठोकून ठाकरे यांनी शाहांशी चर्चा केली आहे. या बंद दाराआडच्या चर्चेत मध्यरात्रीच्या दरम्यान कोणता निर्णय झाला ते जनतेला कळू शकले नाही. शिवसेना गेली चार वर्षे मोदी, फडणवीस आणि भाजपावर टीका, प्रहार करीत सत्तेत आहे. तर भाजपाची बोलकी मंडळी तोंडावर बोट ठेवून आहेत. सोमय्या, शेलार, भांडारी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सेनेची टीका सहन करण्याशिवाय पर्याय नाही. सेनेच्या बाबतीत आता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रतिकूल किंवा अनुकूल बोलू लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेनेशी युती हवीच आहे. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. फडणवीस रोखठोक बोलतात, पण तुकडा पाडावा असे बरळत नाहीत. वार केला तरी समोरचा घायाळ होत नाही. मात्र, जखमी जरूर होतो.
2014 च्या निवडणुकीत जागांच्या वाटपावरूनच विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. आदित्य ठाकरे यांनी 150 प्लस अशी घोषणा करून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हेच असतील, असा पवित्रा घेतला होता. मात्र, केंद्रात मोदी सरकार मजबुतीने आले असल्याने शिवसेनेची डाळ काही शिजली नाही. तेव्हा भाजपाने दणदणीत नाही, तर सत्ता स्थापन करण्याइतके यश मिळवले होते. बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदृश्य हातामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण राष्ट्रवादीच्या बेभरोशाच्या पाठिंब्यावर सरकार चालवणे अवघड असल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाला झाला. त्यामुळे महिनाभराने विरोधी पक्ष असलेली शिवसेना सरकारमध्ये दाखल झाली. युती झाली तरी मनोमिलन झाले नाही. दुय्यम दर्जाची मंत्रिपदे सेनेला स्वीकारावी लागली. ठाकरे यांनी स्वाभिमान विसरून सत्तेत जाण्याची तयारी केली. मात्र, सत्ता नको, पण अवमान, टीका, आरोप तरी आवरा, असे म्हणायची वेळ कायम शिवसेनेवर आली. मागची परिस्थिती आज नाही. भाजपाच्या पथ्यावर पडेल अशी नाही. उलट आजची परिस्थिती शिवसेनाला उभारी देणारी आहे. स्वबळाचा नारा वर्षांपूर्वीच ठाकरेंनी दिला आहे. तरी भाजपा त्यावर गंभीर नाही. सेना युतीत आहे, युतीत राहील, असा आत्मविश्वास शाह-फडणवीस, दानवे करत आहेत. सेनेशी युती होणारच असे मांडे भाजपाचे नेते खात आहेत. दोन्हीकडच्या नेत्यांना, मंत्र्यांना युती हवी आहे. मात्र, घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना नको आहे. हे वास्तव नेते नाकारतात, तेव्हा पक्षसंघटना दुबळी होते. राजकारणात पुन्हा संधी येत नाहीत. यावेळी शिवसेनेला स्वबळाची संधी चालून आली आहे. संधीचे सोने ठाकरे करणार की नाही, हाच सवाल आहे. दोन्ही काँग्रेस पक्ष पुन्हा आघाडीसाठी सरसावले आहेत. त्यांची तयारी झाली. युतीची मात्र नूरा कुस्ती सुरू आहे.”

