Details
मुंबईच्या तोंडचे `पाणी’ पळाले!
16-Apr-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकार भवन आझाद मैदान येथे आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ही वास्तू तेथे दिमाखात उभी आहे. काही वर्षांपूर्वी या वास्तूच्या आवारात बोअरवेल खोदण्यात आली. सुदैवाने अवघ्या 20 फुटांवर पाणी लागले. महापालिकेने ते पाणी तपासले. ते उत्तम प्रतीचे असल्याचे प्रमाणपत्रदेखील दिले. पण शेजारी मेट्रोसाठी खोदकाम सुरू झाले आणि बोअरवेल हळूहळू कोरडी ठणठणीत पडली. रोज शेकडो लीटर पाणी देणारी ही बोअरवेल आता पार सुकून गेली आहे. मेट्रोच्या खोदकामाने तिचे पाणी शोषून घेतले. मुंबईतील इतर ठिकाणी चौकशी केली असता धक्कादायक माहिती हाती आली. जेथे जेथे मेट्रोचे खोदकाम सुरू झाले, तेथे तेथे बोअरवेलचे पाणी आटले. सारांश, मेट्रोने मुंबईच्या तोंडचे पाणी पळविले.
मुंबईचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमात आम्ही एक उपयुक्त पोस्ट वाचली. कोकणातील विहिरी, कूपनलिका व तलाव कसे साफ ठेवता येतील? याचे विवेचन या पोस्टमध्ये आढळले. गावचे गावपण टिकले की स्वच्छता राहते, प्रदूषण होत नाही. महत्त्वाचे म्हणजे पाणी मुबलक शिल्लक राहते. अजूनही आपले पाणी खूप चांगले आहे. पाणी शुद्ध करण्याची मशीन बाजारात आल्यापासून आपले पाणी कसे क्षारयुक्त आहे व त्यामुळे मूतखडा होतो अशी भीती दाखवून आपल्याला मशीन घेण्यास किंवा तथाकथित शुद्ध पाणी विकत घेण्यास भाग पाडले जाते. खरे म्हणजे आपले पाणी नैसर्गिक शुद्ध आहे. ते विहिरी साफ ठेवून तसेच शुद्ध ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली भातशेती ही पृथ्वीवरील कोट्यवधी तलावेच आहेत. कारण त्या भातशेतात चार ते पाच महिने पाणी मुरत असते. तेव्हा भातशेती करणे अधिक हितकारक आहे. भातशेतीमुळे पाणी मुरेल, शुद्ध अन्न, शारीरिक कष्ट व शांत झोपेमुळे आरोग्यदेखील चांगले राहील. यापूर्वीच्या आपल्या पूर्वजांचे आरोग्य जसे ठणठणीत होते, तसेच आरोग्य आपल्या वाट्याला येईल.
आज राज्यातील बहुतेक धरणे कोरडी पडली आहेत. तसेच तेथील शेतातील भूजल पातळीदेखील खोल गेली आहे. कारण नदीचे पाणी थांबवून ठेवल्यामुळे पुढील पात्रात पाणी वाहत नाही. जर पाणी वाहिलेच नाही, तर ते जमिनीत मुरणार कसे? महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक धरणे असूनदेखील पाणी समस्या वाढतच आहे. जेव्हा धरणे नव्हती तेव्हा पाणी समस्यादेखील मोठी नव्हती, हा योगायोग नव्हे! आजकाल जो तो विकासाच्या नावाने बोलतो आहे. पण विकास म्हणजे नक्की काय, हे राज्यकर्त्यांशिवाय कोणालाच ठाऊक नाही. विकास म्हणजे अब्जावधी रूपये खर्च करणे. पूल, रस्ते, समुद्रातील पूल, धरणे आदी बांधणे. त्यातून अब्जावधी रूपये कमविणे. शिवाय निसर्गावर अत्याचार करणे. अजूनही वेळ गेलेली नाही. आज मुंबईच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उद्या राज्याच्या आणि देशाच्या तोंडचे पाणी पळू शकते. निसर्गाकडे मानवाला देण्यासारखे खूप काही आहे. पण मानवाची भूक मोठी आहे. त्यातूनच राक्षसी विकास सुरू आहे. हा `राक्षस’ एक दिवस आपले वाटोळे करेल. त्याआधीच त्याला रोखले पाहिजे.”

