Details
राज ठाकरे कुणाचे प्यादे?
12-Apr-2019
| 0
”
विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच लक्ष्य केले आहे. परिणामी ही निवडणूक त्यांच्याच भोवती फिरणार हे उघड आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चार डझन मित्रपक्षांची महाआघाडी अशी सरळ लढत आहे. तिसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सत्तधाऱ्यांना मदत करण्यासाठी मैदानात आक्रमकपणे उभी ठाकली आहे. शिवसेनेमुळे भाजपला मुंबई आणि महाराष्ट्रात हत्तीचं बळ मिळाले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची शक्ती मोठी आहे. शिवाय कार्यकर्त्यांचे जाळं शिवसेनेकडेच आहे. लातूर येथील युतीच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंचा हात हातात घेऊनच व्यासपीठावर एन्ट्री केली. मोदी स्वत:हून ठाकरेंशी बोलले. बाळासाहेब ठाकरेंचे गुणगान केले. जणू गेल्या साडेचार वर्षांत कोणतेच वितुष्ट आले नाही. राजकीय नेते अभिनय असा काही करतात की, खरे अभिनेते फिके पडावेत.
गुढी पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट केले. पंतप्रधानांचा उल्लेख राज ठाकरेंनी फेकू असा केला. या सरकारला लाथ मारा आणि सत्तेवरून खाली खेचा, असा आदेशच जणू त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला दिला आहे. याआधीच याच राज यांनी मनसेला एकहाती सत्ता द्या, असा हुकूम सोडला होता. महाराष्ट्राची सत्ता घेऊ पाहणाऱ्या त्यांना मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकमेव आमदार मिळाला. अखेर त्या आमदारानेही शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंनी मोदींचा शाही पाहुणचार झोडला. वारेमाप स्तुती केली. गुजरातच्या विकासाचे तोंडभरून कौतुक केले. नंतरच्या म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी भाजप-मोदींना पाठींबा दिला. मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, तेच देशाचा विकास करतील असे भाकीतही त्यांनीही केले होते. तेच मोदी आज कसे फेकू आहेत, मोदींनी देशाची कशी फसवणूक केली आणि भ्रष्टाचारही कसा केला याची दवंडी आज राज ठाकरे देत सुटले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीत सामील न होता याच आघाडीला लाभ कसा होईल याची खेळी त्यांनी केली आहे. राज्यात दहा जाहीर सभा ते घेणार आहेत. या जाहीर सभांत ते काय बोलणार याची चुणूक त्यांनी पहिल्याच सभेत दाखवून दिली आहे.
मोदी पंतप्रधान होऊ नयेत असे अनेकांना वाटते. राज ठाकरेंना तसे वाटत असेल, तर त्यात गैर नाही. मात्र विरोधकांच्या आघाडीत ते सामील झाले नाही. त्यांचा एकही उमेदवार यावेळी लोकसभेची निवडणूक लढवत नाही. तरीही राज ठाकरे जाहीर सभा घेऊन मोदींच्या विरोधात भाषणे देणार याला काय म्हणायचे? स्वत:चा स्वतंत्र पक्ष त्यांनी असा अप्रत्यक्षपणे का होईना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना हे राजकारण कितपत पटले असेल? निवडणुका म्हणजे पक्षाला एक कार्यक्रम असतो. कार्यकर्त्यांना संघटना बांधण्याची संधी असते. नवे कार्यकर्ते निर्माण होत असतात. जनतेशी संपर्क वाढत असतो. आधीही निवडणूक न लढवता जाहीर सभा घेऊन निवडणुकीत सक्रीय राहणारे राज ठाकरे हे एकमेव नेते असावेत. मात्र साहेब असे का वागताहेत हा कळीचा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनाच पडला आहे.
राज ठाकरेंच्या मोदीविरोधी जाहीर सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होईल असे म्हटले जाते. राष्ट्रवादी आशावादी असल्यानेच राज ठाकरेंच्या फुग्यात शरद पवार, अजित पवार यांनी हवा भरली आहे. पार्थची जबाबदारी राज यांच्यावर असल्याचे बोलले जाते. मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार राज ठाकरेंनी केले. वास्तविक पवार काका-पुतण्याने आणि काँग्रेसच्या चव्हाणांनी भाजपवर तसेच मोदींच्या दळभद्री कारभारावर हल्लाबोल करण्याची गरज असताना राज ठाकरेंनी मध्येच त्यांचा ढोल वाजविला आहे. ठाकरी भाषेत राजगर्जना झाली. त्यांच्यासारखे रोखठोक भाषण काँग्रेस आघाडीतील कुणीही नेता करू शकत नाही. त्यामुळेच राज ठाकरेंचे आधारकार्ड पवारांनी फेकले आहे. पवार, मोदी मैत्री आहेच. शिवाय राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते मोदींच्या रडारवर आहेत. परिणामी मोदी-शाहंना शह देण्याचे संकट पवारांवर आहे. मोदींना विरोध आहे. मात्र त्यांच्या विरोधात आक्रमक भाषा, आरोप, इशारे आणि आव्हानं देण्याची कुवत विरोधकांकडे नाही. त्यामुळेच राज ठाकरेंची मदत घेतल्याशिवाय विरोधकांना यश येण्याची चिन्हे नाहीत. सडेतोड, रोखठोक आणि आक्रमक टीका केली असतानाही लातूर येथील सभेत पंतप्रधान मोदींनी राज ठाकरेंच्या सभेची दखलच घेतली नाही. अनुल्लेखाने त्यांना गप्प केले. राज ठाकरेंनी कितीही कठोर टीका, बेलगाम आरोप मोदी-शाहंवर केले तरी त्यांच्या मनसेची मते विरोधकांच्या पारडयात जातील असे नाही. उलट ही मते शिवसेनेकडे वळण्याचीच अधिक शक्यता आहे. तसे झालं तर?”

