Details
औरंगाबादमध्ये कोणाची विकेट पडणार?
19-Apr-2019
| 0
”
अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
राज्यातील एक महत्वपूर्ण लढत असणारी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आता विद्यमान खासदार पाचव्या वेळी पुन्हा खासदार होण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांची विकेट काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. त्याला वंचितच्या उमेदवाराचा अडसर ठरून खैरे हॅट्ट्रिक साधणार हे पाहणे रंजक ठरेल.
भाजपशी युती झाल्यामुळे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे काही अंशी बिनधास्त वाटत आहेत. अंबादास दानवे यांच्यासारख्या पक्षांतर्गत स्पर्धकाचे आव्हान खैरेंसमोर असू शकते पण अशी आव्हाने खैरे लीलया झेलत आले आहेत. युती होण्यापूर्वी खैरे यांना भाजपच्या नेते मंडळीकडून नेहमीच विरोधाची भाषा बोलली जात होती. आजच्या घडीला तर भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर कुरबुरी सुरू असल्याचे चित्र दिसते. सुरूवातीला या मतदारसंघावर राष्ट्रवादीनेसुद्धा दावा केला होता. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे इच्छुक होते तर काँग्रेसमध्येसुद्धा काही आलबेल नव्हते. काँग्रेसचे विद्यमान उमेदवार सुभाष झांबड यांनी गेल्या अनेक महिन्यापासून तयारी केली होती आणि त्यांनी तसा प्रचारसुद्धा सुरू केला होता तर दुसरे इच्छुक अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसशी काडीमोड घेत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. सत्तार हे अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत समजले जातात. काँग्रेस सोडल्यावर त्यांनी कार्यालयातील खुर्च्यासुद्धा आपल्या घरी नेल्या. मधल्या काळात सत्तार यांचे सूर भाजपशी जुळणार अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण सत्तार यांची सतार भविष्यात वाजविण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे सत्तार यांना मानणारा गट झाबंड यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा किती मनापासून काम करतात यावर सगळे अवलंबून आहे.
वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार काँग्रेसकडे किती वळणार हे महत्त्वाचे आहे. वंचितने आधी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पण त्याला एमआयएममधून विरोध झाला. खा. खैरे यांच्याबद्दलचे नकारात्मक वातावरणही तसे खूप आहे. वीस वर्षांत तुम्ही काय केले, असा थेट सवालच लोक आता उपस्थित करीत आहेत. परंतु औरंगाबादची प्रत्येक निवडणूक भावनिकतेवर स्वार होऊन लढल्या जातात. त्यामुळे ‘काय केले’ वगैरे अशा प्रश्नांची फिकीर खैरेंना कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही.
कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची तयारी करीत आहेत. त्यांचा फायदा आणि तोटा कोणाला हे लवकरच समजेल
खेरे हे या मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आले आहेत. येथे असलेले शिवसेनेचे प्राबल्य आणि चांगला जनसंपर्क या खैरे यांच्या जमेच्या बाजू आहेत. या मतदारसंघात जातीय मताचा मोठा प्रभाव आहे. मराठा तसेच मुस्लिम आणि ओबीसी समाज येथे मोठया प्रमाणात आहे. त्याचे विभाजन कोणाला कसे आणि किती प्रमाणात होते त्यावरच जय पराजय ठरेल.”

