Details
अक्षयतृतीयेला उघडली दारं चारधामसाठी!
09-May-2019
| 0
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
kharevinay196509@gmail.com
नुकत्याच झालेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर देशाच्या उत्तर भागात असलेल्या चारधाम यात्रेला सुरूवात झाली. विधिवत हवन, वैदिक मंत्रोच्चारण, पूजाअर्चा करून दुपारी मंदिराची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली. विश्वप्रसिद्द गंगोत्री धाम उघडताच श्रद्धाळूंनी गंगेत स्नान करून गंगेचा जयजयकार करीत दर्शन घेतलं. गढवालचे आयुक्त, जिल्हा पालकमंत्री, मंदिर समिती अध्यक्ष, सचिव आदी यावेळी उपस्थित होते. पुढील सहा महिने ही यात्रा चालणार आहे. यमुनेच्या शितकालीन प्रवासाचे ठिकाण खरसलीवरून यमुनेची पालखी शनीदेवाच्या पुढाकारात यमुनोत्रीला रवाना झाली. मंगळवारी सकाळी निघालेली पालखी दुपारच्या सुमारास यामुनोत्रीत दाखल झाली. मात्र, तत्पूर्वी सजवलेल्या पालखीसमोर स्थानिक लोकांनी पारंपरिक नृत्य करून भक्तिभाव प्रकट केला. रोहिणी नक्षत्राच्या अमृतबेला सिद्धी योगात दुपारी सव्वा वाजता यमुनोत्रीचे दरवाजे उघडले गेले. तर याआधी आपला सहा महिन्यांचा शितकालीन मुक्काम मुखबा गावातून हलवून गंगामातेची पालखी गंगोत्री धामला रवाना झाली.
गावातील लोकांनी रिवाजानुसार सव्वा मण (५०किलो) स्थानिक पक्वान्न नि पूजेसह निरोप दिला. परिसरातील धाराली, हर्षील, उपला, टकनौर गावाच्या गावकरी तिर्थयात्रीसह उपस्थिती होती. मार्कंडेय पुरी येथे विश्राम करून प्राचीन पायवाटेने पालखी सायंकाळी भैरोघाटी येथे पोहोचली. गंगोत्री येथे पोहोचवल्यावर गंगा स्तोत्रं, गंगा लहरी, गंगा सहस्रनाम, अभिषेक आदी धार्मिक विधी झाल्यावर दर्शनासाठी भाविकांना सोडण्यात आलं. श्रद्धाळूंना मंदिरातील अखंड ज्योती दर्शनही मिळेल. पूजापाठानंतर गंगा मातेची मूर्ती विराजमान करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय मंत्री उमा भारती बर्निगड येथे आल्यावर त्यांनी गंगोत्रीचं दर्शन घेतलं. सदर यात्रेच्या फोटोमॅट्रिक नोंदणीसाठी हृषीकेश बस अड्डयाजवळ येथे २५ एप्रिलपासून सुविधा सुरू केली आहे. यासाठी सतरा खिडक्या चालू केल्यात. गुरूद्वारा श्री हेमकुंड साहिब येथेही नोंदणी होते. बडकोट, हिना उत्तरकाशी, सोनप्रयाग फाटा, केदारनाथ मार्ग, हरिद्वार रेल्वेस्थानक, हृषिकेष बसस्थानक नि गुरूद्वारा आदी ठिकाणी ही सोय केली आहे.
यात्रेदरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी यात्रा दहा दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे. यात्रामार्गावर फिरते वाहनदुरूस्ती केंद्रं उभारली असून भद्रकाली, ब्रह्मपुरी, दामता, कुठलगेट, इथे तपासणी नाके बसवलेत. चप्पल न घालता वाहन चालवणाऱ्यावर कारवाई होणार आहे. यासाठी झालेल्या बैठकीत दहा दिवसांत चार धाम, सात दिवसांत तीन, पाच दिवसांत दोन तर एक धामची यात्रा तीन दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे, असं ठरविण्यात आलं आहे. सार्वजनिक वाहनात प्रथमोपचार पेटी, गणवेश सक्ती, ज्वलनशील बाबींवर बंदी याकडेही लक्ष दिले जाणार आहे. ४० टक्के बस यात्रेसाठी तर ६० टक्के बस शहर, इतर वाहतुकीसाठी ठेवल्या जाणार आहेत. याचा राज्यातील बससेवेने विचार करावा.
चारधाम यात्रेसाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उंचावरील हवामान, उपलब्ध सुविधा, यात्रेचे नि राहण्याचे साधन, रस्त्यातील मदत नि प्रवासात घ्यायची खबरदारी या माहितीने यात्रा सुकर होईल. हॉटेल, धर्मशाळा, वाहन याचे दर ठरवून घ्यावेत. हवामानामुळे रस्ते खराब, त्यामुळे वाढीव वेळेचं नियोजन, गरम कपडे, स्वतःच्या गाडीऐवजी बसने प्रवास करावा. बांबू काठी, छत्री, विजेरी (बॅटरी) जरूरी अन्नपदार्थ, याचा पुरेसा साठा आवश्यक असून हृदयरोग्यांनी डॉक्टरी सल्ला नि तपासणी करून जावे. इतर भागात तापमान कमी असलं तरी धामांजवळील ५० किमी. परिसरात थंडी पडतेच. मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता रूंदीकरणाची कामं चालू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या होऊ शकते.
वैद्यकीय सुविधा असतेच, पण आपलीही व्यवस्था ठेवावी. तशी ही यात्रा आव्हानात्मक असल्याने काळजी घेणे आवश्यक ठरतं. जास्त वयाच्या लोकांना उंचीवर ऑक्सिजनची गरज पडू शकते. यासाठी चिंतेची बाब नाही. कारण, बऱ्याच मुक्कामाच्या ठिकाणी अडीचशे-तीनशे रूपयांत छोटे ऑक्सिजन सिलेंडर मिळतात. उपयोगात न आलेले, त्याच दुकानात परत घेतले जातात. ऋषिकेषसह श्रीनगर येथे मोठी औषधांची दुकानं आहेत. जाणार असाल तर शुभेच्छा. नाहीतर इथूनच म्हणा गंगा माता की जय, हर हर गंगे, जय जय गंगे!”

