Details
.. अन उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी घेतला दुआ!
23-May-2019
| 0
”
दोन लाखांचे दागिने दिले शोधून
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
kharevinay196509@gmail.com
राज्यात-देशात खून, दरोडे, मारामाऱ्या, घडतच असतात. शिक्षा कोणतीही करा, पण जोपर्यंत माणसाची वृत्ती बदलत नाही तोपर्यंत असं घडतच राहणार. हे जरी खरं असलं तरी त्याच्यावर आळा घालण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली तर संबंधितांचे दुआच मिळतात. पोलिसांनी एक लग्न घरातील दोन लाखांचे दागिने मिळवून देत दुआ घेतलाय.
ही घटना आहे कामगार हॉस्पिटल परिसरातील संगीत शेट्टी यांच्याबाबतची. १७ मे रोजी खरेदी झाल्यानंतर सायंकाळी ४-४.३० दरम्यान त्यांनी रिक्षा केली नि त्या घरी गेल्या. मात्र, तिथे त्यांना धक्काच बसला. कारणही तसेच होते. मुलीचे लग्न दुसऱ्या दिवशी असल्याने त्यांनी दोन लाख रूपयांचे दागिने बनवले नि ती बॅग रिक्षातच राहिल्याचे लक्षात आले. त्यांची स्थिती वेड्यापिशासारखी झाली हे सांगायला नकोच. रिक्षा क्रमांक माहीत नसल्याने त्यांनी तडक धाव घेतली ती नेहरू चौक वाहतूक चौकीत. तेथील पो. ह.४४३८ जितेंद्र चव्हाण यांनी इतर चौकशी केली. पण रिक्षा क्रमांक नसल्याने वर्णन घेत धीर दिला नि वाहतूक वॉर्डन अशोक ननावरे, संजय आंधळे यांची मदत देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पाठवले.
सदर महिला शिरू चौकातील कोणत्या रिक्षात बसून निघाली याचा दुकान आणि चौकातील सीसीटीव्हीआधारे वाहतूक पोलीस निरीक्षक आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला. वाहन एप्पच्या सहाय्याने रिक्षाचालकास चौकीत बोलावले. मिळालेली बॅग चालकाने देत पोलीस ठाण्यात जमा करणारच होतो असं सांगितलं. तसाच लगोलग त्या महिलेला निरोप देऊन पाचारण करण्यात आले. तिने नातलगासह येऊन तपासणी करीत बॅग व आतील सामानाची पाहणी करताच संगीता यांना अक्षरशः रडूच कोसळले. आधी दागिने वियोगाने, नुकसानीने रडत होत्या, त्याच आता आनंदानं रडत होत्या. त्यामागे मुलीच्या लग्नात इज्जत वाचली हेही कारण होतेच! देव नि पोलिसांचे आभार मानत त्यांनी रिक्षाचालकाला रोख बक्षीस दिले.
या दागिन्यांची किंमत दोन लाख रूपये एवढी होती. त्यात ३० ग्रॅम दोन सोन्याच्या बांगड्या, ४ ग्रॅम एक जोडी कानातील रिंग, दोन लेडीज दोन जेन्ट्स अंगठ्या, असा ऐवज होता. ओळख पटवून ते दागिने पोलिसांनी त्या महिलेच्या हाती सुपूर्द केले. यावेळी रिक्षाचालक, मालक, युनियन पदाधिकारी, कार्यकर्ते, दुकानदार संबंधित पोलीस हजर होते. याआधी गेल्या महिन्यात पोलिसांनी रिक्षात विसरलेली रोख रक्कम ४० हजार शोध लावत परत केली होती. लोकांनी आपले मौल्यवान ऐवज काळजी घेऊन नीट सांभाळावे, दक्षता घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.”

