Details
“मुंबई शहराच्या संरक्षणाची जबाबदारी नौदल सांभाळत असल्यामुळे त्यांचा या आर्थिक राजधानीच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.”
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने भारत सरकारच्या सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल म्हणजेच `सागर’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आयोजित `सागर’शक्ती प्रदर्शनाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केल्याचे प्रशंसोद्गारदेखील त्यांनी याप्रसंगी काढले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नौदलातील नौका, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे तसेच सरक्षणविषयक बाबींची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. यात प्रामुख्याने युवा आणि विद्यार्थी वर्गाचा सहभाग विशेष होता.”
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात असताना सशक्त नौदलाचे पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलंय, त्यामुळे भारतीय नौदलाचा दबदबा जगभरात आहे तसेच आपल्या सागरी सीमादेखील सुरक्षित आहेत, असे स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी यावेळी सांगितले.”
“श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, रायगडचे प्रमुख सुनील पवार यांनी शिवरायांची आरमारविषयी दूरदृष्टी, मोगलांना तसेच समुद्री शत्रूंना नामोहरम करण्याच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, या प्रदर्शनाचे नेटके संयोजन केल्याबद्दल विनायक काळे तसेच नौदलाच्या अधिका-यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.”

