जयंत पवार यांचा नाटक-कथाकार म्हणून लौकिक झाला असेलही. परंतु त्यांची नजर पत्रकाराची होती. संधी मिळाली असती तर ते एक धाडसी पत्रकार झाले असते, अशी खंत जयंत पवार यांच्या पत्नी संध्या नरे-पवार यांनी व्यक्त केली.
जयंत पवार यांच्या अभिवादन सभेत त्यांनी ही खंत उघडपणे व्यक्त केली. लोकवाङ्मय गृह आणि विद्रोही चळवळीतर्फे ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. लोकवाङ्मय गृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या अभिवादन सभेस सर्व थरातील लोक उपस्थित होते. डावे होते, उजवे होते, विद्रोही होते, जयंतचे मित्र होते, चाहते होते, पत्रकार मित्र होते, कोण नव्हते तेव्हडे विचारा.. विशेष म्हणजे जयंतचे विचार आवडणारा युवावर्गही मोठया संख्येने उपस्थित होता.
या अभिवादन सभेस उपस्थित असणाऱ्यांनी जयंतकडे वेगळी नजर होती.. असा आवर्जून उल्लेख केला. खरेतर ती नजर पत्रकाराची होती म्हणून तर त्याला वेगळा विचार सुचत असे आणि त्याबरहुकूम तो लिहीत असे. त्याच्यातील समीक्षक, नाटक-कथाकाराला जितके उचलून धरले गेले तितकेच त्याच्यातील पत्रकाराला डावलले गेले असे मला सतत वाटत आले आहे, अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली.
साहित्यिक व नाटक वर्तुळात वावरणाऱ्या जयंतच्या वाटेस एखादे सदरही येऊ नये का? असा रास्त सवाल त्यांनी संबंधितांना विचारला. गेली काही वर्षे कर्करोगाशी सामना करताना ज्या मित्रांनी वेळोवेळी सहाय्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. पुरस्कार वापसीच्या वेळी जयंतने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे जवळच्या मित्रांनीही केलेल्या टीकाटिप्पणीबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
रंगकर्मी मंगेश कदम व विजय केंकरे यांनी जयंतच्या मैत्रीसंदर्भात काही आठवणी सांगितल्या. कोणाला कोणती भूमिका सूट होईल हे जयंत अचूक ओळखत असे, या शब्दात मंगेश कदम यांनी आदर व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी आपल्या जिवलग मित्राबाबत काही आठवणी सांगितल्या. जयंत शांत बसून काहीही ऐकून घेत असे, हे आपल्याला बिलकुल आवडत नसे, असे समर यांनी स्पष्ट केले. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनीही आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्याला आदरांजली वाहिली. ज्येष्ठ रंगकर्मी शहाफत खान यांनीही जयंतच्या नाट्यलेखनाचा गौरव केला. लोकवाङ्मय गृहाचे राजन बावडेकर यांनी समारोप केला.
लोककवाङ्मय गृहाने अलीकडच्या काळात आयोजित केलेल्या चांगल्या कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम ठरावा. (कोरोना काळात कार्यक्रम बंद होते. परंतु त्याआधीचा काळ गृहीत धरला आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.)

