महाराष्ट्रात सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदारयादीतील सर्व मतदारांनी येत्या ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीला येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. वेळेत गणना अर्ज भरून सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदारयादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत, असेही या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रारूप मतदारयादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ (आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह) भरून मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील. दावे व हरकतीच्या या कालावधीत मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ भरता येणार आहे. संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार मतदारयादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत नोंदवू शकतो. मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार संबंधित व्यक्तीला एक वर्षापर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असेही या कार्यालयाने कळवले आहे.
राज्यातील अंतिम मतदारयादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना नाव समाविष्ट करणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुना क्रमांक ६ द्वारे अर्ज करता येणार आहे. मतदारयादीचे अद्ययावतीकरण ही निरंतर प्रक्रिया असून, कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत अशा सुधारणा करता येतात, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

