कधीकधी रात्रीच्या शांततेत किंवा दिवसाच्या गजबजाटात आपण अचानक एका जाळ्यात अडकतो. हे जाळे बाहेरचे नसते, तर ते आपल्याच मनातील विचारांचे असते. आपण धावत असतो कधी भूतकाळातील चुकांच्या मागे, तर कधी भविष्यातील काल्पनिक संकटांच्या समोर. यालाच आपण ‘ओव्हरथिंकिंग’ किंवा अतिविचार म्हणतो. पण या चक्रातून बाहेर पडणे शक्य आहे का? यावर उत्तर ‘हो’ असेच आहे.
१. भूतकाळ आणि भविष्य: दोन मृगजळे– भूतकाळ आपल्याला पश्चात्ताप देतो आणि भविष्य आपल्याला भीती. पण सत्य हे आहे की, भूतकाळ आता अस्तित्त्वात नाही आणि भविष्य अजून जन्माला आलेले नाही. आपण आपली सर्व ऊर्जा अशा दोन गोष्टींवर खर्च करतो ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. आपण जेव्हा या दोन टोकांवर झुलत असतो, तेव्हा आपल्या हातातील ‘आज’ वाळूसारखा निसटून जात असतो.
२. ट्रिगर ओळखा आणि कागदावर उतरवा– अतिविचारांचे एक मूळ कारण असते, ज्याला आपण ‘ट्रिगर’ म्हणतो. एखादी व्यक्ती, एखादा शब्द किंवा सोशल मीडियावरील एखादी पोस्ट आपल्याला विचारांच्या गर्तेत ढकलू शकते. जेव्हा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ होईल, तेव्हा एक छोटा प्रयोग करा. एक कागद आणि पेन घ्या आणि जे काही वाटतंय ते लिहून काढा. जेव्हा विचार डोक्यात असतात तेव्हा ते अवाढव्य वाटतात. पण तेच विचार जेव्हा कागदावर अक्षरांच्या रूपात उतरतात, तेव्हा त्यांचे गांभीर्य कमी होते. कागदावर लिहिल्यामुळे तुम्हाला त्या समस्येचे स्वरूप स्पष्टपणे समजते.

३. सजगता: तुमचे सर्वात मोठे शस्त्र- सजगता किंवा ‘माइंडफुलनेस’ म्हणजे काय? तर स्वतःच्या विचारांकडे त्रयस्थपणे पाहणे. जेव्हा तुम्ही अस्वस्थ असता, तेव्हा स्वतःला सांगा- “मला भीती वाटत नाहीये, तर माझ्या मनात भीतीचा विचार येत आहे.” यामध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही विचारांपासून स्वतःला वेगळे करता, तेव्हा तुम्हाला ते विचार नियंत्रित करण्याची शक्ती मिळते. लक्षात ठेवा, आपण ज्या गोष्टीबद्दल जागरूक नसतो, ती गोष्ट आपण कधीच बदलू शकत नाही.
४. विचार म्हणजे सत्य नव्हे– आपल्या मनाचा एक स्वभाव आहे, तो प्रत्येक गोष्टीचे भयानक चित्र रंगवतो. अशावेळी मनाला उलट प्रश्न विचारा- “हे जे मला वाटतंय, ते खरंच वास्तव आहे का? की ही फक्त माझ्या मनाची एक कथा आहे?” जोपर्यंत आपण एखाद्या विचाराला ‘सत्य’ मानून त्याला शक्ती देत नाही, तोपर्यंत तो विचार फक्त एक हवेचा झोत असतो. त्याला न्यायाधीशासारखे पारखू नका, फक्त एका साक्षीदारासारखे पाहा.
५. कृतीची ताकद- अतिविचार हा नेहमी रिकाम्या वेळेचा आणि निष्क्रियतेचा सोबती असतो. जेव्हा तुम्ही विचार करत बसता, तेव्हा समस्या मोठी होत जाते. पण जेव्हा तुम्ही ‘कृती’ करता, तेव्हा समस्या सुटू लागते. छोटी पाऊले उचला. जर एखाद्याशी बोलल्याने मन हलके होणार असेल, तर जाऊन बोला. जर मनात काही शंका असेल, तर ती स्पष्ट करा. संकोच करू नका.
शेवटी, आपण सर्वच माणसे आहोत. कधीकधी मनावरचा ताबा सुटणे स्वाभाविक आहे. अशावेळी विश्वासू व्यक्तींशी बोला, गरज पडल्यास मदत मागा. स्वतःशी थोडे दयाळू वागा. तुमचे विचार म्हणजे तुम्ही नव्हेत; तुम्ही त्या विचारांच्या पलीकडे असलेले एक शांत आकाश आहात. ढगांना वाहून जाऊ द्या, आकाश आपोआप स्वच्छ होईल.
(लेखक मनिषा रेगे ज्येष्ठ पत्रकार आहेत. छायाचित्र ड्रीम्सकोट डॉट कॉमच्या सौजन्याने)

