Homeएनसर्कलआता रेल्वे आणि...

आता रेल्वे आणि दूरसंचार विभाग एकत्रित काढणार हरवलेल्या मोबाईलचा माग

रेल्वे प्रवाशांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करणे, त्यांचा माग काढणे आणि ते परत मिळवण्यासाठी दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यात भागीदारी झाली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईल फोनच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा दलासोबत ही भागीदारी केली आहे.

या भागीदारीअंतर्गत दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे प्रवाशांचे हरवलेले वा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून ते परत मिळवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील. यादृष्टीने रेल मदत (Rail Madad) हे अॅप आता दूरसंचार विभागाच्या संचार साथी (Sanchar Saathi) या व्यासपीठासोबत जोडले गेले आहे.

मोबाईल

दूरसंचार विभागाच्या संचार साथी या व्यासपीठाअंतर्गत तक्रार केलेले चोरीला गेलेले/हरवलेले मोबाईल फोन ब्लॉक करण्यासाठी म्हणजेच वापरासाठी प्रतिबंधित करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर रेल मदत अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान असलेल्या तक्रारी किंवा समस्यांचे निराकरण करून घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता या दिशेने काम करताना संचार साथी पोर्टलवर रेल्वे सुरक्षा दलाची 17 क्षेत्र आणि 70हून अधिक विभागांना जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता प्रवासी रेल मदत अॅपवर हरवलेल्या वा चोरी गेलेल्या मोबाईल फोनबाबत तक्रार नोंदवू शकतील. या तक्रारीचे तपशील संचार साथी पोर्टलवर पाठवले जातील. यामुळे हरवलेला/चोरी गेलेला मोबाईल फोन ब्लॉक करून त्याचा गैरवापर रोखण्यात मदत होणार आहे. याशिवाय या मोबाईल उपकरणांचा मागोवा घेणे आणि त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाला त्याबाबतची सूचना जारी करणे शक्य होईल.

याव्यतिरिक्त, दूरसंचार विभाग नागरिकांना संचार साथीच्या CEIR मॉड्यूलचा वापर करून हरवलेले वा चोरीला गेलेल्या मोबाईल फोनची तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे दूरसंचार सेवा अधिक सुरक्षित आणि वापरकर्त्यांना अनुकूल बनवण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्नांना चालना मिळू शकणार आहे. नागरिकांनी संचार साथी अॅपचा वापर करून सायबर गुन्हे आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दूरसंचार संसाधनांच्या गैरवापर होत असल्याबाबतच्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहनही दूरसंचार विभागाने केले आहे. सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतर्गत, ग्राहक हितांचे रक्षण करण्यासाठी दूरसंचार विभाग कठोर देखरेख आणि तातडीच्या कारवाईसाठी प्रयत्नशील आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content