Homeटॉप स्टोरीअसे ऑपरेशन केले...

असे ऑपरेशन केले की टाकाही पडला नाही!

मिलिंदजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून शिवसेनेत स्वागत करत आहे. तुमची आता जी भावना आहे तीच भावना माझीही दीड वर्षापूर्वी होती. परंतु राजकारणामध्ये वेळ आल्यावर डॅशिंग निर्णय घ्यावे लागतात. ऑपरेशन करायचे होते. पण, सुईही लागू द्यायची नव्हती. मी डॉक्टर नव्हतो. श्रीकांत डॉक्टर आहे. पण असे ऑपरेशन केले की टाकाही पडला नाही, असे उद्गार शिवसेनेचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.

माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. देवरांसोबत काँग्रेसचे २५ माजी नगरसेवक आणि ४५० कार्यकर्त्यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, पदाधिकारी तसेच दक्षिण मुंबईतील विविध उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांनी आणि अनेक व्यापारी व व्यापारी संघटनांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी है. मी दीड वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. हेलीकॉप्टरने गावी गेलो आणि शेती केली तर प्रवासाचे आठ तास वाचतात. त्यात शेकडो फायली काढल्या जातात. हे यांना कळत नाही. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली केव्हाही चांगली. गावी गेल्यावर मी जनता दरबार घेतो. ऑफिस किंवा घरी बसून विकास होणार नाही. मी रस्त्यावर उतरून काम करतो, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आले की विरोधकांच्या पोटात दुखते. आमचे काम पाहून पोटदुखीचे रुग्ण वाढले आहेत. पण आम्हाला याने काही फरक पडत नाही. जनतेचा आणि महाराष्ट्राचा विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि आता मिलिंदजींची साथ मिळाल्याने हे उद्दिष्ट लवकर साध्य होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मुंबईत आम्ही सुरू केलेल्या डीप क्लिन ड्राईव्ह मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मी झाडू हातात घेतला की आयुक्त चहल, आमदार व खासदारही हातात झाडू घेतात. हे म्हणतात की यांना साफ करणार. जे रस्त्यावर असतात. रस्त्यावर उतरून काम करतात, जनता त्यांनाच उचलून धरते. घरी बसणाऱ्यांना साफ करते. तशाच प्रकारे निवडणुकीत विरोधकांचीही आम्ही सफाई करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आता पूर्वीची काँग्रेस राहिली नाही – मिलिंद देवरा

यावेळी मिलिंद देवरा म्हणाले की, गेली 55 वर्षे माझ्या कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले नाते आज मी तोडत आहे. आज मी खूप भावूक झालो आहे. पूर्वीची काँग्रेस आणि आताची काँग्रेस यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. काँग्रेसमध्ये विकासात्मक व सकारात्मक मूल्यांना आणि मेरिट व योग्यतेला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे आपण हा मोठा निर्णय घेतला. राजकारणामध्ये लोकसेवा आणि जनसेवा हीच विचारधारा असली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा मेहनती, दिवसरात्र काम करणारा, सर्वसामान्य माणसाला भेटणारा, चांगली निर्णयक्षमता असलेला, लोकांना सहजपणे लोकांना भेटणारा, जमिनीवरचा मुख्यमंत्री मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही आणि म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत आणि बळकट करायचे आहेत.

ज्या काँग्रेसने माजी पंतप्रधान आणि त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी ३० वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा पायंडा रोवला तोच पक्ष आज देशातील उद्योगपतींचा अपमान करत आहे. त्यांना देशद्रोही म्हणत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा विरोध करायचा हेच यांचे एकमेव उद्दिष्ट राहिलेले आहे, असेही देवरा म्हणाले.

माजी मंत्री मिलिंद देवरा यांच्यासोबत, महिला आयोगाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सुशीबेन शहा, माजी नगरसेवक सुनील नरसाळे, प्रमोद मांद्रेकर, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव तसेच काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content