Homeमुंबई स्पेशलकागदपत्रे, पुरावे देऊनही...

कागदपत्रे, पुरावे देऊनही १४२ झोपडीधारक अपात्र!

मुंबईतल्या कांदिवली पूर्व श्री समर्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पातील झोपडीधारकांना विकासक व प्रशासनाने गेल्या पंधरा वर्षांपासून बेघर करून अपात्र केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरापैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत. याविरोधात संस्थेचे  शिष्टमंडळ म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना नुकतेच भेटले. त्यांनी  अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत पुरावे पाहून सर्व झोपडीधारकांना पात्र करण्याचे निर्देश  दिले. त्यामुळे अपात्र झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे.

विकासक दिनेश बन्सल यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे झोपडीधारकांना घरापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. संस्थेने या झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पुरावे सादर केले. परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. ते घरापासून वंचित तर आहेतच, परंतु त्यांना एसआरए योजनेअंतर्गत विकासकाकडून भाडेसुद्धा मिळालेले नाही. यामधील काही लोक श्रमजीवी आहेत तर काही महिला धुणीभांडी करून उपजीविका करणाऱ्या आहेत. त्या सर्व सभासदांना त्रास होत आहे. त्यामुळे ते  हतबल झालेले आहेत.

या संदर्भात त्यांनी संस्थेशी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क करून न्यायाची मागणी केलेली आहे. त्यामुळे संस्थेने म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र तत्पूर्वीच मनसेचे बाळकृष्ण पालकर, आरपीआयचे हरीश मुत्तराज , राष्ट्रवादीचे विष्णू पवार, दिव्या विचारे, प्रकाश चव्हाण, व्यापारी असो.चे अध्यक्ष ओमप्रकाश जोशी, प्यारेलाल यादव, उमेश सिंग ठाकूर, मनोज आवटे, विजया रेड्डी नाथन, पुष्पा रेड्डी, अर्चना पोसवाल, सावित्री दुबे, या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बोरीकर यांनी तातडीने म्हाडा अधिकाऱ्यांना पाचारण करून अपात्र झोपडीधारकांचे कागदपत्रे तपासून योग्य असल्यास पंधरा दिवसाच्या आत पात्र करा असे निर्देश दिले. यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय मी खपवून घेणार नाही आणि माझ्याकडे पुन्हा अशा तक्रारी नकोत असे म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. झोपडीधारकांनी आपले पुरावे सादर करताना फोटो काढून ते आपल्याकडे ठेवावेत. जर त्यावर कार्यवाही झाली नाही तर पुन्हा आपण माझ्याकडे या असे सांगून त्यांनी शिष्टमंडळाचे समाधान केले. आता अधिकारी कशाप्रकारे कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content