Homeएनसर्कलकाँग्रेस स्थापनादिनी सोनिया,...

काँग्रेस स्थापनादिनी सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी नागपुरात!

काँग्रेसच्या स्थापनादिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबरला नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या महारॅलीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज नागपूरमध्ये दिली.

नागपूरच्या हॅाटेल ली मेरिडीयन येथे के. सी. वेणुगोपाल, खा. मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिशन ओझा, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, अमर राजूरकर, नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, अभिजीत सपकाळ आदी नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, देशभरातून काँग्रेसचे जनसमर्थन वाढत आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये भरघोस वाढ दिसून आली. कर्नाटकनंतर काँग्रेसने तेलंगणातही स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून देशाची संसदही सुरक्षित राहिलेली नाही तर देश कसा सुरक्षित असेल?

लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर आतापर्यंत दोनदा हल्ला झाला आणि दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्षाचेच सरकार होते. संसदेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारले असता, प्रश्न विचारणाऱ्या १४ सदस्यांनाच निलंबित करण्यात आले. पण ज्या भाजपा खासदारांकडून या हल्लेखोरांना पास देण्यात आले होते त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली नाही, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, नागपूरमध्ये होणाऱ्या महारॅलीला राज्यभरातून १० लाख लोक उपस्थित राहतील. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, पक्षाचे सर्व सेल व विभाग ही महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवरच असल्याने ही महारॅली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व ऊर्जा निर्माण करण्याचे काम करेल. नागपूरमध्ये होणारी महारॅली ऐतिहासिक असेल व देशात परिवर्तनाचा संकेत देणारी ठरेल.

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content