Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या ९५९ महसुली...

महाराष्ट्रातल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील लोकांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले.

मुंबईत मंत्रालयातील वॉर रुम येथे मदत, पुनर्वसन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनील चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि. र. दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील उर्वरीत तालुक्यातील काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती ९५९ महसुली मंडळामध्ये देण्यात येतील, असेही पाटील म्हणाले.

राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता १ लाख लाभार्थ्यी शेतकऱ्यांना ५ लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली. जेणेकरून राज्यातील पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच जून २०१९मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेत पिकांच्या नुकसानीकरिता  मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने अस्तित्त्वात आलेली महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत, तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

१७८ तालुक्यातील ९५९ सर्कलमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर

अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळं, अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ७३, बुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील  ७०, वाशीम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१, यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील ९, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५०, बीड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५२, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३, जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यामधील १७, लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४५, नांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३, धाराशीव जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २८, परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ३८, नागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५, वर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६, अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६, धुळे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील २८, जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७, नंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुक्यातील १३, नाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४६, कोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २०, पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१, सांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७, सातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील ६५, सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ४६,  अशी एकूण १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली  आहे.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content