Skip to content
Homeमुंबई स्पेशलउद्यापासून मुंबई मेट्रो...

उद्यापासून मुंबई मेट्रो २ अ आणि ७ धावणार रात्री ११ वाजेपर्यंत!

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरापर्यंत म्हणजेच रात्री ११ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७वरून शेवटची मेट्रो आता रात्री साडेदहाऐवजी ११ वाजता सुटणार आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे.

या निर्णयानुसार उद्या, शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री ११ वाजेपर्यंत सुरक्षित प्रवास करता येणार आहे. हा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, दिवाळी सण हा उत्साहाचा आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूकप्रणाली आहे. मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय आपण घेतला आहे.

मेट्रो

दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती. पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मुंबई महानगर प्रदेशात एक भक्कम सार्वजनिक वाहतूकव्यवस्था ठरताना दिसत आहे. दररोज लाखो प्रवासी मेट्रोने प्रवास करू लागले आहेत. नागरिकांचे आयुष्य आणखी सुखकर होऊ लागले आहे. मेट्रोची वेळ वाढविल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यावरणपूरक आणि इंधन, वेळेची मोठी बचत करणारी ही मेट्रो आपल्या मुंबईची शान ठरेल असा विश्वास आहे. आपली मेट्रो स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. फलाटावर आणि स्थानक परिसरातही सुरक्षा नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याचे सुचविले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अच्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता रात्री साडेदहाऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ सेवा साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे या स्थानकांदरम्यान सकाळी ५:५५ ते रात्री ११दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होणार आहेत. तसेच, रात्री १०नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत २ अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिमदरम्यान २ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मेट्रो

मेट्रो मार्ग २ अ आणि ७वर आतापर्यंत सुमारे ६ कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी विविध उपाययोजना आम्ही राबवित आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णयदेखील मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.

Continue reading

भाजपा दाऊद इब्राहिमलाही पक्षात देणार का प्रवेश?

भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष समजतो. पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्षप्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले...

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...