‘स्टिच्ड शिपबिल्डिंग मेथड’ म्हणून ओळखल्या जाणार्या जहाजबांधणीच्या 2000 वर्ष जुन्या तंत्राचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्याच्या उल्लेखनीय उपक्रमाअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि कार्यान्वयनावर भारतीय नौदल देखरेख ठेवेल. त्यांचा बहुमूल्य अनुभव आणि तांत्रिक ज्ञान प्राचीन जहाज बांधणी पद्धतीचे यशस्वी पुनरुज्जीवन तसेच जहाजाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

ऐतिहासिक महत्त्व आणि पारंपारिक कारागिरीचे जतन लक्षात घेता, भारतामध्ये या प्राचीन जहाज बांधणी पद्धतीला मोठे सांस्कृतिक महत्व आहे. संपूर्ण इतिहासात, भारताला एक भक्कम सागरी परंपरा लाभली आहे आणि अशा पद्धतीने निर्मित जहाजांनी व्यापार, सांस्कृतिक देवघेव आणि शोध कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

खिळे वापरण्याऐवजी लाकडी फळ्या एकत्र जोडून बांधण्यात आलेली ही जहाजे लवचिकता आणि टिकाऊपणा देतात, ज्यामुळे माशांचा मोठा थवा (शोल्स) आणि वाळूच्या बंधाऱ्यापासून होणारे नुकसान कमी होते. युरोपियन जहाजांच्या आगमनामुळे जहाजबांधणीच्या तंत्रात बदल झाला असला तरी, जहाज बांधणीची कला भारतातील काही किनारी प्रदेशांमध्ये, प्रामुख्याने लहान स्थानिक मासेमारी नौकांसाठी अजूनही टिकून आहे.

भावी पिढ्यांसाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी लुप्त होत चाललेल्या या कलेचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. जहाज बांधणीच्या प्राचीन भारतीय कलेचा वापर करून महासागरात जाणारे लाकडी बांधणीचे जहाज तयार करण्याचा प्रस्ताव हा एक स्तुत्य उपक्रम आहे.

भारतातील उर्वरित पारंपरिक जहाज निर्मात्यांच्या कौशल्याचा लाभ घेणे आणि त्यांची असाधारण कारागिरी सर्वांसमोर आणणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. पारंपरिक नौवहन तंत्रांचा वापर करून प्राचीन सागरी मार्गांवर प्रवास करून, हा प्रकल्प हिंद महासागरातील ऐतिहासिक परस्परसंवादाची सूक्ष्म दृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करत आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती, ज्ञान प्रणाली, परंपरा, तंत्रज्ञान आणि कल्पनांचा प्रवाह सुलभ झाला.


