Details
“हीच का, देशप्रेमी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता?”
19-Feb-2019
| 0
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
शानदार, जानदार, सीनातान भाषणबाजीतून देशवासीयांच्या काळजाला हात घालण्यात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुणीचं हात धरू शकतं नाही, हे त्यांनी वारंवार सप्रमाण दाखवून दिलं आहे. काश्मिरच्या पुलवामा येथील हल्ल्यात देशासाठी वीरमरण पत्करणार्या 44 भारतीय जवानांचं बलिदान कदापि व्यर्थ जाऊ देणार नाही. आपले सैनिक वेळ, काळ ठरवून बदला घेणारच! हे आपल्या संवेदनशील भाषणातून अगदी 56 इंचाची छाती ताणून ते 125 कोटी भारतीयांना वारंवार सांगत फिरत आहेत.
14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3.15 ला पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ला झाल्याची खबर वार्यासारखी पसरली. त्यावेळीही पंतप्रधान एका जाहीर कार्यक्रमात होते. तेव्हापासून शोकसागरात बुडालेले पंतप्रधान अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. या हल्ल्याचे चोख उत्तर कसे देता येईल, या विचाराने त्यांना पुढचं मागचं काही दिसत नाही नि सूचत नाही. फक्त लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने हल्ल्यानंतर दुसर्या दिवशी ते यवतमाळ जिल्हा पांढरकवडा येथे मतांच्या ओढीने त्यांना यावं लागलं. पांढरकवडा येथे शेकडो महिला बचत गटांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या सर्व महिलांच्या मतांची गोळाबेरीजही झालीच असावी. या सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारकी भाषण ठोकून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या प्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिलीच. तुम्ही माझ्या कामावर समाधानी आहात का? माझ्या परिश्रमावर समाधानी आहात का? मी जे काम करतोय त्यावर तुम्ही खूश आहात का? तुमचा आशीर्वाद मला कायम राहणार का? असे सवाल करत महाराष्ट्रातील जनतेशी त्यांनी मतसंवाद साधला. पण, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले बुलडाण्याचे नितीन राठोड आणि संजय राजपूत यांना याच दिवशी शोकाकुल वातावारणात निरोप दिला जात असताना पंतप्रधान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिकडे फिरकावेसेही वाटले नाही.
फडणवीसांनाही राजकारण हे देशापेक्षा किती महत्त्वाचे आहे हे दाखवून द्यायचे असावे. ज्या दिवशी पुलवामा येथे हल्ला झाला त्याच दिवशी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी गळ्यात गळे घालून बैठक मांडली होती. ही त्यांची संवेदनशीलता देशासाठी प्राणांची आहुती देणार्या जवानांप्रती तेव्हाही दिसून आली होती. महाराष्ट्रातल्या दोन वीर जवानांना अखेरचा निरोप दिला जात असताना प्रचारकी भाषण स्थळापासून अवघ्या 300 किमीवर मोदी व फडणवीसांना आपल्या हॅलिकॉप्टरचे उड्डाण भरून पोहोचता आले नाही. इतकेच काय बुलडाण्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनाही पंतप्रधानांना सोडून आपल्या जिल्ह्यातील सैनिकांना मानवंदना देण्यासाठी जाता आले नाही. निवडणुकीपेक्षा शहीद जवानांचे महत्त्व ते काय? उरी, पुलवामा अन्य हल्ल्यात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय लष्कराचे शेकडो जवान सीमेवर शहीद झाले आहेत होत आहेत.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रातील सरकारवर पाकिस्तानाच्या कुरापतींवरून तुटून पडायचे. आपल्या पंतप्रधानांच्या हातात भारतीय लष्कर, नौदल, वायूदल असताना आपण पाकिस्तानला मुळासकट उखडून का फेकत नाही? सीमेवर दररोज शहीद होणार्या आपल्या सैनिकांना पाहून माझा तीळतीळ तुटतो आहे, अशा गमजा मारणार्या मोदीसाहेबांचे व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अगदी हसावं की रडावं असचं. देश व सैनिकांप्रती त्यांचे हे प्रेम देशभर संतापाचा चहूबाजूंनी भडका उडाला असताना प्रचारकी भाषणबाजीतून दिसून येतो, हा सवाल त्यांच्याच भाषेत देशातील 125 कोटी जनतेने त्यांना का विचारू नये? तरीही पंतप्रधानांच्या देशप्रेमावर आपण शंका न घेतलेली बरी. कारण त्यांच्याही मनात बदल्याची आग धुमसते आहे. पाटणा येथे शहीद संजयकुमार सिन्हा आणि रतनकुमार ठाकूर या जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना ही भावना बोलूनही दाखवली आहे. बिहारच्या बरौनी येथे निवडणूकपूर्व विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांनी उरकून घेतले. पुलवामातील शहीद जवानांप्रती देशभरात संतापाचा वणवा पेटला आहे.
ठिकठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन केले जात आहे. आपले 44 सैनिक गमावल्याचं दुःख देशातील प्रत्येक झोपडी, चाळ, वसाहतींत आहेत मात्र मोदी सरकारच्या लेखी हा राष्ट्रीय दुखवटा नाही. एखादी अभिनेत्री, अभिनेता अथवा नेत्याचे निधन झाल्यावर राष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण, आपल्या 125 कोटी भारतीयांसाठी छातीची ढाल करून सीमेवर लढणार्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांप्रती नाही? सैनिक हुतात्मा झाल्यावर तेवढ्या दिवसांपुरतं दुःख व्यक्त करणं हा निव्वळ ढोंगी आणि लबाडपणा नव्हे का? लोकार्पण, भूमिपूजन, उद्घाटन सोहळे आणि जाहीर संभाचे फड रंगवणे म्हणजेच राष्ट्रीय दुखवटा आता मानावा का? हमल्याला जुमला मानणारी ही मानसिकता वरवर संवेदनशीलता दाखवत असेल तर ती काय कामाची? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात धुमसत असलेली आग, दुःख संताप महाराष्ट्र, बिहारमध्ये विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमाने थंड होत असेल तर काय घ्यावं?”

