Details
केएचएल न्यूज ब्युरो
“भारतीय सामरिक सामर्थ्याच्या प्रत्यय घडवून आणणारे `सागर’ हे शक्ती प्रदर्शन मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी युवा वर्गाची एकच गर्दी दिसून येत होती. भारत सरकारच्या सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल म्हणजे `सागर’ या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार स्थापनादिनाचे म्हणजे वसुबारसचा मुहूर्त साधून भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र विभागाचे कमांडर सुनील बालकृष्णन, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षीत, माजी नौदल उपप्रमुख अभय कर्वे, तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक टी. आशिष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, राष्ट्रीय सुरक्षा मंचाचे विनायक काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ”
चर्चासत्राचेही आयोजन
“यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात भारतीय नौदलाच्या उत्क्रांतीचा आढावा घेत कमांडर सुनील बालकृष्णन यांनी 5 हजार वर्षांपूर्वी वैदिक कालखंडातील नौदलाचे उल्लेख ते सिंधू नदीच्या खोऱ्यातील नौकानयन आणि संरक्षण यांचा आढावा घेतला. नौदलाची देशाच्या संरक्षणात तसेच मदतकार्यातील भूमिकादेखील स्पष्ट करत त्यांनी त्सुनामीनंतर श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव येथील मदतकार्य, केरळ तसेच महाराष्ट्रातील अतिवृष्टीनंतरचे मदतकार्य यांच्याविषयी माहिती दिली. ”
तटरक्षक दलात करिअरच्या अनेक संधी
“भारतीय तटरक्षकाला अनेक पातळ्यांवर कार्य करत महानगरांची सुरक्षा, औद्योगिक केंद्रे, संरक्षण दलांचे तळ, अण्वस्त्र प्रकल्प आदींची सुरक्षा करावी लागते. हे आव्हानात्मक काम असले तरी त्यातून मिळणारे समाधान ध्यानात घेता विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर करिअरच्या दृष्टीने या विषयाकडे पाहवे, तटरक्षक दलात करिअरच्या अनेक संधी असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक टी. आशिष यांनी केले.”
नौदल सामर्थ्याचे प्रदर्शन
“नौदलातील नौका, जहाजे, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे तसेच अन्य सामरिक शक्तींच्या सामग्रींच्या प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन यानिमित्ताने जनतेसाठी दररोज सकाळी १० ते ८ या कालावधीत खुले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाचा हास, सामर्थ्य, क्षमता आदींबाबतची झलक अनुभवता आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत २७ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता समारोप झाला.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील जकार्ता येथील कार्यक्रमात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल म्हणजेच सागर या संकल्पनेची घोषणा केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सामर्थ्य तसेच त्यातून परस्पर विकास, अशी ही संकल्पना असून त्यानिमित्ताने यातील प्रत्येक राष्ट्राने त्या अनुषंगाने आपली सामरिक शक्ती वाढवून परस्पर सहकार्य आणि प्रगतीसाठी त्याचा अवलंब करावा, असा दृष्टिकोन आहे. या संकल्पनेला अधिक व्यापकतेने जनतेपुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”

