HomeArchive`नवाकाळ’चे अभिनंदन!

`नवाकाळ’चे अभिनंदन!

Details
`नवाकाळ’चे अभिनंदन!

    07-Mar-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या भिम पराक्रमामुळे `अभिनंदन’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अभिनंदन हे शौर्य गाजविणाऱ्यांचे करायचे असते. पराक्रम करणाऱ्यांचे करायचे असते. इतिहासात आपली कर्तबगारी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणाऱ्यांचे करायचे असते. या पार्श्वभूमीवर या तीनही निकषांच्या कसोटीस उतरणाऱ्या दै. `नवाकाळ’चे आम्ही आज मन:पूर्वक अभिनंदन करीत आहोत.

`नवाकाळ′ सुरू होऊन आज 97 वर्षे झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी `नवाकाळ′ शतक महोत्सव साजरा करील. या प्रदीर्घ प्रवासात `नवाकाळ’चे संस्थापक नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि त्यांच्या वारसदारांनी केलेली कामगिरी अभूतपूर्व अशीच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी `नवाकाळ′ सुरू केला तेव्हा परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. देशात इंग्रजांचे राज्य होते. त्या राजवटीविरूद्ध `ब्र’ काढणे म्हणजे प्राणघातक संकटास आमंत्रण देणे होते. पण हे आव्हान स्वीकारून खाडीलकरांनी `नवाकाळ′ सुरू केला आणि ब्रिटिशांच्या जुलूमी राजवटीविरूद्ध आवाज बुलंद करीत तो चालवला. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव य. कृ. तथा आप्पासाहेब खाडीलकर यांनी तो तितक्याच नेटाने, जिद्दीने आणि परिश्रमपूर्वक सुरू ठेवला.

वर्तमानपत्र चालविणे हे तेव्हा सतीचे वाण मानले जात होते. त्यावेळी भांडवलदारांची वर्तमानपत्रे नव्हती. ध्येयवादी वृत्तपत्रांचा तो काळ होता. त्या काळातच `नवाकाळ’चा उदय झाला आणि प्रतिकूल परिस्थितीत तो पाय रोवून उभा राहिला. आप्पासाहेबांचे कर्तबगार चिरंजीव निलकंठ खाडीलकर यांनी `नवाकाळ’ची सूत्रे स्वीकारेपर्यंत `नवाकाळ′ अक्षरश: डबघाईला आला होता. तो बंद पडण्याच्या मार्गावर होता. पण `नवाकाळ′ वाढविण्याचे आव्हान निळूभाऊ खाडीलकरांनी दमदारपणे स्वीकारले. पुढे काही वर्षातच त्यांनी हे आव्हान यशस्वी करून दाखविले.

. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे यांच्या लेखणीच्या बळावर दै. `मराठा’ प्रचंड लोकप्रिय झाला होता. तेव्हा आचार्य अत्रेंना संयुक्त महाराष्ट्र लढ्याची अनुकूल पार्श्वभूमी लाभली होती. दुर्दैवाने आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर काही वर्षातच ‘मराठा’ बंद पडला. त्यामुळे मराठी वृत्तपत्रसृष्टीत फार मोठी उणीव निर्माण झाली. ती उणीव निळूभाऊंच्या संपादकत्वाखालील `नवाकाळ’ने भरून काढली. निळूभाऊंचे अग्रलेख गाजू लागले. त्यांच्या परखड अग्रलेखांमुळे `नवाकाळ’चा खप झपाट्याने वाढू लागला. भांडवलदारांच्या वर्तमानपत्रांशी सामना देणे हे अजिबात सोपे नव्हते. पण आपल्या लेखणीच्या बळावर निळूभाऊंनी ते सोपे करून दाखविले. म्हणूनच वाचकांनी त्यांना `अग्रलेखांचे बादशहा’ हा किताब प्रेमाने बहाल केला. या बादशहाला शोभेल अशीच पत्रकारिता निळूभाऊंनी वर्षानुवर्षे केली. कोणत्याही मुख्यमंत्र्याचा अथवा मंत्र्याचा मुलाहिजा न बाळगता ते जनतेच्या बाजूने लिहित राहिले. गोरगरीब जनतेचा आवाज बुलंद करीत राहिले.

1982 साली सुरू झालेल्या गिरणी कामगार संपाच्या काळात तर `नवाकाळ′, `संध्याकाळ′ आणि `शिवनेर’ या वर्तमानपत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केली. निळूभाऊंनी आपल्या लेखणीच्या बळावर गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. लुटारू गिरणीमालक कामगारांची देणी देण्याचे टाळत होते. पण तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी यशस्वी वाटाघाटी करून निळूभाऊ खाडीलकर यांनी गिरणी कामगारांना त्यांची कोट्यवधी रुपयांची देणी मिळवून दिली. `नवाकाळ′ यशस्वी करण्यासाठी निळूभाऊंनी कठोर तपश्चर्या केली. रात्रीचा दिवस करून ते परिश्रमपूर्वक राबले. डोळयात तेल घालून त्यांनी `नवाकाळ′ वाढविला. पुढे `नवाकाळ’चे संपादकत्व त्यांनी आपल्या द्वितीय कन्या जयश्री खाडीलकर यांच्याकडे सोपविले. तसेच `संध्याकाळ’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी आपल्या तृतीय कन्या रोहिणी खाडीलकर यांच्यावर टाकली. त्यांच्या या दोन्ही कन्या आजही दोन लोकप्रिय वर्तमानपत्रे यशस्वीपणे चालवित आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जयश्री खाडीलकर पांडे यांच्या संपादकत्वाखालील `नवाकाळ’चा 97 वा वाढदिवस साजरा होत आहे हादेखील एक मोठा योगायोग आहे. `नवाकाळ’चे पुन्हा एकदा अभिनंदन करीत असताना आम्ही `नवाकाळ’च्या शतकी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा देत आहोत.”
 

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content