HomeArchiveदुसऱ्या कारकीर्दीतही मोदींचा...

दुसऱ्या कारकीर्दीतही मोदींचा विश्वसंचार सुरूच!

Details
दुसऱ्या कारकीर्दीतही मोदींचा विश्वसंचार सुरूच!

    12-Jun-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
गेल्या महिन्याच्या २६ तारखेला नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कारकीर्दीची सुरूवात केली. त्यानंतर आता दहा-बारा दिवस होत असतानाच ते दोन देशांची यात्रा संपवून परतही आले आहेत. पंतप्रधानांनी किती परदेश प्रवास करावा याचे नवे नियमच मोदींनी स्थापित केले आहेत. त्यांच्या पहिल्या कारकीर्दीमधील परदेश प्रवासावर काँग्रेसने कडवट टीका केली होती. समाज माध्यमांतूनही मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून टीका-टिप्पणी होत होती. पण अशा टीकेला त्यंनी कधीच धूप घातली नाही. मोदी जे करत होते ते करणे अत्यावश्यक होते हे देशातील जनतेला जाणवतच होते. त्याचेच प्रत्यंतर मतपेटीमधून आलेच.

आताही नरेंद्र मोदींनी आपल्या दुसऱ्या टर्मची सुरूवात परराष्ट्र धोरणातील नव्या पावलांनी केली आहे. २०१४ मध्ये त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा एक नवा पायंडा त्यांनी पाडला. तब्बल आठ देशांचे प्रमुख तेव्हा उपस्थित होते. त्यात पाकिस्तानी पंतप्रधानांचाही समावेश होता हे विशेष. पण पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांपेक्षा सैन्यदले अधिक प्रभावी आहेत हेच त्याही वेळी स्पष्ट झाले. मोदींच्या शपथविधीला हजर राहिलेल्या नवाझ शरीफ यांना पाक लष्कराने गुंडाळून ठेवले आणि भारताविरूद्धच्या अतिरेकी कारवाया जोरात सुरू केल्या. तिथे राजवट बदलली तरीही दहशतवादाला खतपाणी घालण्याचे धोरण सुरूच आहे. त्यामुळेच पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोदींच्या दुसऱ्या राज्यारोहण सोहळ्याचे निमंत्रणच देण्यात आले नाही. पाकला वगळून अन्य शेजारी राष्ट्राचे प्रमुख शपथविधीला हजर राहतील याची काळजी भारत सरकारने घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेजारच्या राष्ट्रांशी उत्तम संबंध राहवेत यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्या अनुषंगानेच त्यांनी मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याची आखणी केली. आधी ते केरळमध्ये गेले. तिथल्या जनतेचे त्यांनी मतदानासाठी आभार मानले व पुढे मालदीवची राजधानी माले इथे दाखल झाले. कोची या केरळच्या बंदरामधून मालदीवची राजधानी माले या बंदरापर्यंत फेरी बोट सुरू करण्याची संकल्पना घेऊनच मोदी मालदीवमध्ये दाखल झाले. शेजारच्या सर्व राष्ट्रांमधील दळणवळण सुविधा वाढवायचे धोरण भारताने घेतले आहे. पंतप्रधान मोदींनी मालदीव भेटीत ‘शेजारधर्माला प्राधान्य’ देण्याच्या आपल्या धोरणानुसार मालदीवशी सहा द्विपक्षीय करार केले. मालदीव संसदेतील भाषणात पाकिस्तानचे नाव टाळून, एका देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचा मानवतेला सर्वात मोठा धोका असल्याचे निदर्शनास आणले. त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी जगातील नेत्यांना केले.

मालदीवची राजधानी माले येथे मोदी यांचे आगमन झाले तेव्हा विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्यात व्यापक चर्चा झाली. दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पाकिस्तानच्या भूमीतील दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे त्या देशाने थांबवावे, असेही पाकिस्तानला बजावण्यात आले आहे. परंतु आता डोक्यावरून पाणी गेले आहे. त्यामुळे जगातील नेत्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

भारत आणि मालदीवमध्ये फेरीबोट सेवा सुरू करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर या भेटीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहमद सोलीह यांच्यात दोन देशांमधील दळणवळण वाढीला महत्त्व देण्यावर एकमत झाले. याशिवाय, जलमापन विज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्य, आरोग्य क्षेत्र, सागरी प्रवासी आणि मालवाहतूक, भारताचे प्रत्यक्ष कर मंडळ, सीमा शुल्क विभाग आणि मालदीवची कस्टम्स सव्‍‌र्हिस यांच्यात सीमाशुल्क क्षमता निर्मितीतील सहकार्य करार करण्यात आले. तसेच मालदीवच्या सनदी सेवा अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय सुशासन केंद्र, प्रशासकीय सुधारणा आणि मालदीव सव्‍‌र्हिस कमिशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. भारतीय नौदल आणि मालदीवचे नॅशनल डिफेन्स फोर्स यांच्यात गैरलष्करी व्यापारी जहाजांच्या वाहतुकीच्या माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही तांत्रिक करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष सोलीह यांच्यात सौहार्दपूर्ण चर्चा झाली, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

दोन्ही नेत्यांनी किनारी टेहळणी रडार यंत्रणा आणि मालदीवच्या सैन्यासाठी संयुक्त प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव भेटीतही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी घोषणा देऊन मालदीव या मुस्लीमबहुल देशाशी आपले संबंध किती दृढ आणि महत्त्वाचे आहेत, हे दाखवून दिले. शेजारधर्माला प्राधान्य हे आपल्या सरकारचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘रूल ऑफ निशान इझ्झुद्दीन’ हा मालदीवचा सर्वोच्च किताब मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. असाच दुसरा दौरा मोदींनी लगेचच श्रीलंकेचाही केला. ही सुरूवात आहे पुढे त्यांचा विश्वसंचार वेगाने सुरूच राहणार आहे.”
 

Continue reading

पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले!

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा संबंधांवरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे....

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...

उद्धव ठाकरे करणार रजनीश काकडेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई प्रेस क्लबने त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाजवळच्या वास्तूत दिवंगत ज्येष्ठ छायाचित्र-पत्रकार रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ८ मेपासून आयोजित केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता या...
Skip to content