HomeArchiveझाडांचे तळतळाट अन्...

झाडांचे तळतळाट अन् सीमोल्लंघन!

Details
 
 
 
विनोद साळवी..
 
 
मांगल्याचं आणि सुविचारांचं सोनं लुटण्याचा दसरा, विजयादशमीचा सण. परंपरा अन् संस्कृतीचं लेणं असलेल्या या मंगलदिनाच्या आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या. झेंडूच्या फुलांत गुंफलेलं आंब्याच्या टावलीचं पान आणि भाताच्या लोंबी हे धनधान्याने तृप्तता दाखवणारं तोरण काल घरोघरी बांधलं गेलं. अश्मंतक अर्थात कफ व पित्तावर गुणकारी आपट्याच्या झाडांची पाने वाटून आपण सोनंही लुटलं. पूजा पाठ, सरस्वती व शस्त्र पूजनही केलं आणि मानवी विचारांच्या कक्षा रूंदावून आपण पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून आपला ऊर गर्व आणि अभिमानाने बडवून घेतला. याचवेळी ४ ऑक्टोबर २०१९ची काळरात्र संपूर्ण महाराष्ट्र आणि देशवासियांनी कायम स्मरणात ठसवली. आपल्या मोबाईलची मेमरी सातत्याने आपण वाढवत असलो तरी आपली मेमरी अगदी संपत चालली आहे. एका लाकूडतोड्याने रात्रीच्या अंधारात `विकास’ साधण्यासाठी कसा घेतला, याच्या कहाण्या पुढच्या पिढ्याही आपल्या मुलाबाळांना सांगतील.
 

या लाकूडतोड्याने एक दोन नव्हे तर तब्बल ४०० झाडांच्या मुळावर असा काही घाव घातला की त्यांना आ की उ बोलायची सोय ठेवली नाही. होय, पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी लाकूडतोड्या अर्थात माणसाने हा कुटील डाव साधला. तो फक्त मेट्रोची झुकझूक ऐकण्यासाठी. आरे-आरे असं बेंबीच्या देठापासून कोकलणाऱ्या पर्यावरणस्नेहींना झाडांचं पान अन् डोळ्याचं पातंही न लववता असं काही करून दाखवलं की त्याला इतिहासात तोड नाही. कशाला हवी मुंबईजवळ ही वनसंपदा, निसर्गसंपदा, ना बिबट्यांचं, ना सापांचं, ना माकडांचं, ना प्राणी आणि पक्ष्यांचं, सालं एका रात्रीत अनधिकृत बांधकामविरोधात त्यांची घरं नेस्तनाबूत करून दाखवली. आता कितीही बोंबला, सुप्रिम कोर्टात जा. हम करेसो कायदा नि एकमेकांचा फायदा. ‘मुंबईला दुबई करून दाखवू’, खरतंर दसऱ्याच्या शुभदिनी आपण प्रत्येकाने महाराष्ट्र शासन आणि प्रशासन यांच्या अभिनंदनाचं तोरण वस्त्या-वस्त्यांत बाधलं पाहिजे होतं. विकासासाठी यांच्या बुद्धीला तोड नाही, असे बॅनर्सही चौकाचौकांत झळकावले पाहिजे होते.
 
 
मुंबईचं फुफ्फुस, हृदय असलेलं आरेच जंगल रातोरात कापलं, रानमेव्यावर जगणाऱ्या आदिवासींना बदडलं, आरे वाचवा म्हणणार्या आंदोलकांना तुरूंगात डांबलं आणि फक्त विकासाचं समर्थन केलं. चुकलं कुठं? २५०० पैकी अवघी ४०० झाडे तोडली तर इतकं आकांडतांडव मग सर्वच झाडे तोडल्यावर काय? अहो, इथं हजारोंच्या संख्येने झाडं लावली जाणार आहेत. सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाचं यासाठी कौतुक करावं तितकं थोडंच आहे. २५०० झाडे तोडण्यासाठी हिरवा कंदिल दाखवल्यापासून ते अगदी दिवा लावून झाडे तोडण्यापर्यंत जी काही तत्परता दाखवली आहे, हे कुणाच्या बापाला कधी जमलं नाही. ‘मिशन झाडे लावा’ म्हणत लाखो झाडांची बात करणारे राज्याचे वनमंत्री दुसर्यात दिवशी आरेत पडलेले झाडांचे मुडदे बघण्यासाठीही डोकावले नाहीत. ते फक्त विकास होत आहे म्हणून. प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी ‘झाडे तोडा, झाडे लावा’ हा आरेचा पार्ट टू याहूनही हिट ठरणार आहे.
 
 

 
 
 
अगदी निसर्गसंपन्न कोकणात नाणार होणारच. मग, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला श्वास घ्यायलाही फुरसत मिळणार नाही. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा र्हा स, जमिनीची धूप, चहूबाजूंनी रखरखाट वाळवंटात घरोघरी उज्ज्वला गॅसप्रमाणे प्रत्येक माणसी ऑक्सिजनचं नळकांडं पुरवलं जाणार. हळहळू ‘मी, लाभार्थी’ अंतर्गत या योजनेसाठी नोंदणीही सुरू होईल. त्यामुळे त्वरा करा! श्वसनाचे फुफ्फुसाचे विकार अशा नाना विकारांवर अक्सिर इलाज हे ऑक्सिजनचं नळकांडं ठरणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षतोडीने मानवी जीवनावर काहीएक परिणाम होणार नाही, हा नवा विचार आपण आत्मसात करूयात.
 
 
दसऱ्यासाठी आपट्यांचं पान सोन्याचं असल्याने यापुढे आपट्याच्या झाडांचं पान अन् पान खुडून काढू, त्याला उघड-बोडकं करूया. तो आपल्या सण, उत्सव आणि परंपरेचा भाग आहे. एकमेकांना अलिंगन वा हातात हात मिळवूनही हा सण सोन्यासारखा साजरा करता येईल, हा विचार का बरं करावा? आरेच्या निमित्तानं रात्रीच्या लाकूडतोड्याने जो काही परिपाठ देशाला घालून दिला आहे तो पाहता पर्यावरण, निसर्ग संपविण्यासाठी तुम्ही-आम्ही कधीच सीमोल्लंघन केले आहे. फक्त विचाराचं सोन लुटताना ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या सुवचनाची आपल्याला नव्या स्वरूपात मांडणी करावी लागणार आहे.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content