Details
जन पळभर म्हणतील ‘हाय हाय’..
05-Jan-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
कवी भा. रा. तांबे यांचे हे गीत लता मंगेशकर यांनी गायिले आणि वसंत प्रभू यांनी ते स्वरबद्ध केले. माणसाच्या जीवनातील वास्तव दर्शविणारे हे गीत अजरामर झाले. काही घरात या गीताचा प्रत्यय काही काळानंतर येतो तर काही ठिकाणी तो लगेच अनुभवता येतो. अलिकडेच दोन भिन्न क्षेत्रांतील दोघा दिग्गजांचे निधन झाले. क्रिकेटमधील द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखक, पटकथाकार, संवादलेखक आणि लोकप्रिय अभिनेते कादर खान हे ते दोन दिग्गज होय.
यापैकी आचरेकर हे क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर याचे गुरू. त्यांनी जसे सचिनला घडविले तसेच बलविंदर सिंह संधू, विनोद कांबळी, प्रवीण आमरे आदी अनेक कसोटीपट्टू तयार केले. आपले उभे आयुष्य त्यांनी क्रिकेटला वाहिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल करून त्यांचा गौरव केला, तर त्यांचा लाडका शिष्य पुढे ‘भारतरत्न’ झाला. सचिनने आपल्या गुरूला खांदा दिला तेव्हा ‘पद्मश्री’ला ‘भारतरत्ना’ने खांदा दिल्याचे दूर्मिळ चित्र पाहावयास मिळाले. आचरेकर सर गेल्यामुळे केवळ त्यांचे शिष्यच रडले नाहीत तर क्रिकेटवर प्रेम करणारे तमाम क्रिकेटप्रेमी हळहळले. पण आपले दुर्दैव पाहा. आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. हिंदी सिनेमातील नटी श्रीदेवी ही मद्यपान करून दुबईत मरण पावल्याचे उघड झाले. तिचा मृत्यू वादग्रस्त असल्याचेदेखील बोलले गेले. त्या श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावर टीका झाली तेव्हा श्रीदेवीला मिळालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे कारण देऊन सरकारने शासकीय इतमामातील अंत्यसंस्काराचे समर्थन केले. पण ते सरकारी अंत्यसंस्कार भारतीय क्रिकेटला आकार देणारे, क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे आणि नि:स्वार्थपणे जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू घडविणारे रमाकांत आचरेकर यांच्या नशीबी आले नाही. सरकार त्यांना काही तासांत विसरले.
कादर खान यांनी हिंदी सिनेसृष्टी गाजविली. त्यांनी लिहिलेले अनेक संवाद बोलून अमिताभ बच्चन, गोविंदा यांच्यासारखे नट लोकप्रियतेच्या शिखारावर पोहोचले. विनोदी अभिनेता म्हणून कादर खान यांनी कमाल केली. शक्ती कपूर, गोविंदा आदींसोबत रूपेरी पडद्यावर उत्तम अभिनय करून त्यांनी प्रेक्षकांना मनमुरादपणे हसविले. त्यांचे जीवन काही काळासाठी का होईना सुखी बनविले. ते कादर खान कॅनडात वयाच्या 81 व्या वर्षी नुकतेच निधन पावले. गेले काही वर्षे ते खूप आजारी होते. कॅनडात त्यांच्या तीन मुलांनी त्यांना उत्तमोत्तम उपचार दिले. पण कादर खान यांनी अखेर या कृतघ्न जगाचा निरोप घेतला. ते कॅनडात असताना सिनेसृष्टीतील एकाही मायीच्या पुताने त्यांची साधी चौकशी केली नाही. त्यांना कधी फोन केला नाही. ते अनेकांचे निकटचे स्नेही होते. पण त्यापैकी कोणीही कधी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली नाही. त्यांचे चिरंजीव सरफराज म्हणतात, ‘तुम्हाला कोणाची अधिक आठवण येते?’ असे आम्ही त्यांना विचारायचो तेव्हा ते क्षणात उत्तर द्यायचे ‘बच्चन साब.’ (अमिताभ बच्चन). कादर खान यांचे निधन निदान त्यांच्या कुटुबियांच्या सहवासात झाले. पण अनेक लोकप्रिय कलाकार उपेक्षित आणि दिनवाण्या अवस्थेत निधन पावले. त्यांचे कोणी आज नावदेखील घेत नाही. म्हणूनच भा. रा. तांबेंची ती कविता आठवते आणि मन उदास होते.”

