येत्या 19 जून रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
उद्धव ठाकरे यांचा गट येत्या 19 जूनला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा घेणार आहे. हा मेळावा नियमबाह्य आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून घेतला जाणारा मेळावा अधिकृत आहे. उद्धव ठाकरे गटाचा, जे काय त्यांना तात्पुरते नाव मिळाले होते- शिवसेना उबाठा, याची स्थापना दहा ऑक्टोबर 2022 रोजी झालेली आहे. त्यामुळे 19 जूनला शिवसेनेचा नावाने हे मेळावा घेऊ शकत नाहीत आणि असा जर मेळावा त्यांनी घेतला तर त्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाऊ शकते, असेही नितेश राणे म्हणाले.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राजाराम राऊत यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत नाकीनऊ आल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे खरे आहे. मोदी सरकारच्या सरकारच्या काळात दहशतवाद्यांचे, भ्रष्टाचाऱ्यांना नक्की नाकीनऊ आले. तुमच्या मालकाला नाकीनऊ आले. त्यामुळे चार वेळा घरी डॉक्टरांना बोलावावे लागले, असे त्यांनी सांगितले.
या नऊ वर्षांत देशाने जी प्रगती केली आहे, पंतप्रधान मोदी यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने नेले आहे, हे राऊतांसारख्या राजकीय दलालाला कधी कळणार नाही. हे म्हणतात की पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही. मग अडीच वर्षे तुमचे मुख्यमंत्री जे फेसबुक लाईव्हचा सपाटा चालवत होते, तेव्हा त्यांना का नाही सांगितलं की पत्रकार परिषद घ्या. तुम्ही पंतप्रधानांना लोकांची मन की बात ऐकायला सांगता… तुमच्या मालकांना तुम्ही का नाही सांगितलं की लोकांच्या मन की बात ऐका, फक्त पाटणकरांची नको. तुम्ही म्हणता कायदा कोठ्यावर नाचतो. अशी भाषा तुम्हीच करू शकता. कारण, आरेच्या गेस्ट हाऊसमध्ये कोण कुठे नाचत होते, तुम्हाला माहित आहे. तुमच्या मालकाचा मुलगा महाविकास आघाडीच्या काळात रोज संध्याकाळी साडेसातनंतर डिनो मोरियाच्या घरी कोणाकोणाला नाचवायचा, किती अधिकारी नाचायचे, हे पण जरा सांगा… असे राणे म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचा झेंडा, हा शेठजींचा झेंडा आहे असे बोलण्याची हिंमत तुमची कशी झाली? तुमच्या मालकाचा हातात आता झेंडा राहिला नाही आणि काठीही राहिली नाही. भाजपाचा झेंडा हिंदुत्वाचे प्रतीक आहे. हा मराठी माणसाचा अभिमान आहे. मुंबईतल्या मराठी माणसांचा टक्का कमी कोणामुळे झाला? तुमच्या मालकाच्या दलालीमुळे ही वेळ कशी आली, हेही तुम्ही सांगितलं तर बरं होईल. तुमचे मालक आता लंडनमध्ये फिरत आहेत. त्यांचं बिल कुठचे शेठजी आणि व्यापारी भरत आहेत याची नावे जाहीर करू का, असा सवालही नितेश राणे यांनी केला.

