महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी आज सत्ताधारी तसेच विरोधकांकडून फक्त सहाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी अखेरच्या क्षणाला जगताप नावाच्या पुण्यातल्या एका पत्रकाराने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे छाननीच्या दिवशी ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण, पुण्यातल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे अजित गोपछडे यांनी विधान भवनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. साडेचार वर्षांची मुदत शिल्लक असताना राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे तांत्रिक अडचण टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी सध्याच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीच्या वतीने पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या वतीने अलीकडेच पक्षात दाखल झालेले काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकऱ बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात तसेच पक्षाचे बहुसंख्य आमदार यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ संपत असतानाच जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज वैध ठरण्यासाठी त्यावर किमान दहा आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. अर्जाच्या छाननीत हे पाहिले जाईल. हा अर्ज वैध ठरल्यास काँग्रेसच्या हंडोरे यांच्या निवडीला धोका निर्माण होऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीतही ऐनवेळी क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे हंडोरे यांचा पराभव झाला होता.