Homeमाय व्हॉईसपुण्याच्या भोरमध्ये थोपटेंचे...

पुण्याच्या भोरमध्ये थोपटेंचे कमळ फुलणार का?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दररोज अधिकाधिक बिकट होत आहे. देशभरात काँग्रेसपुढे आव्हाने वाढतच आहेत आणि राहुल गांधींचे नेतृत्त्व मतदारांमध्ये फारसा उत्साह जागृत करताना दिसत नाही. पक्षही वेगाने पुढे जाताना दिसत नाही. “भाजपाच्या विचाराला देशात जर कोणी विरोध करू शकेल तर तो केवळ काँग्रेस पक्षच,” असे गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे दररोज सांगतात खरे, पण नेमका कसा विरोध करणार, कार्यक्रम व रोडमॅप काय, हे काही ते सांगू शकत नाहीत. ते सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच नेतृत्त्वाला न रुचणारे प्रश्न करणाऱ्या शशी थरूरसारख्या नेत्यांनाच पक्षात एकटे पाडले जाते. अलिकडेच अहमदाबादेत काँग्रेसच्या महासमितीची बैठक पार पडली. तिथेही असेच दोन मतप्रवाह दिसले. काँग्रेसची घसरगुंडी काही थांबताना दिसत नाही. महाराष्ट्रात स्थिती आणखी बिकट होत आहे. जनतेत प्रभाव असणारे मिलिंद देवरा, अशोक चव्हाणांसारखे नेते मागील काळात काँग्रेसला सोडून गेले. देवरा एकनाथ शिंदेंकडे गेले व राज्यसभेत पोहोचले. अशोकराव भाजपात गेले व आता ते राज्यातील भजापाच्या शीर्ष नेतृत्त्वाच्या मालिकेत बसलेले दिसतात. त्यांना राज्यसभेचीही संधी लगेचच दिली गेली. काँग्रेसचे मागील दोन-तीन वर्षांत गाजलेले आमदार होते पुण्याचे धंगेकर. ते अलिकडेच पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत गेले आहेत. आता ते पुणे मनपात पुन्हा काही करून दाखवण्यासाठी ते उत्सुक दिसतात. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आणखी एक मोठे नेते राहिलेले थोपटे घराणेही आता काँग्रेसपासून दुरावताना दिसते आहे. ही अशी स्थिती का झाली व ही स्थिती अधिकाधिक का बिघडते आहे याचे चिंतनमनन मात्र काँग्रेसमध्ये होताना दिसत नाही.

2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या राज्यात चौथ्या क्रमांकाची होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा काँग्रेस सतेत्तील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. विधानसभेतील पहिल्या क्रमांकाचा भाजपा 105 आमदार कमळावर निवडून आलेले असतानाही मातोश्रीच्या कृपेने सत्तेबाहेर राहिला होता. तर दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजे 56 आमदार असणाऱ्या ठाकरेंच्या तेव्हा अखंड असणाऱ्या शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने राज्याची सत्ता काबीज केली होती. पण सत्तेची ती मोट बांधणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी नेहमीप्रमाणे महत्त्वाची खाती घेतल्यानंतर काँग्रेसला उरल्यासुरल्या खात्यांवर व जेमतेम दहा मंत्रीपदांवर समाधान मानावे लागले होते. आता तर 2019मधील असणारी 43 आमदारसंख्याही मोठ्या प्रमाणात ढासळली असून 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आमदार पक्षाचा त्याग करत आहेत. काँग्रेसची आमदारसंख्या आता थेट 16पर्यंत खाली आली आहे. त्यांना समाधान इतकेच असेल की रा. काँ. शरद पवार पक्षाची आमदारांचीसंख्या काँग्रेसपेक्षाही बरीच खालावलेली आहे. शरद पवरांकडे आधी 52 आमदार होते. ते आता फक्त दहा उरले आहेत. काँग्रेसचे जुनेजाणते नेते पराभूत होऊन घरी बसले आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची नावे महाविकास आघाडीचे संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे दावेवार म्हणून घेतली जात होती. ते दोघेही पराभूत झाले आहेत.

थोपटे

पुणे जिल्ह्यातील भोर हा सातत्याने काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. तिथे संग्राम थोपटे यांनी 2009पासून सलग तीन वेळा विजय मिळवला होता. तत्पूर्वी संग्रामदादांचे वडील अनंतराव थोपटे एक अपवाद वगळून सलग पाच वेळा आमदार राहिले होते. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत थोपटेंचा पराभव राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार शंकर मोंडेकर यांनी करून दाखवला. अजितदादांच्या उमेदवाराने 1.26 लाख मते घेतली तर संग्राम यांना 1.06 लाख इतकीच मते पडली. 19 हजार मतांनी ते विधानसभा निवडणूक हरले. त्याआधीच्या 2019च्या निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी अखंड शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांचा नऊ हजार मतांनी पराभव केला होता. संग्राम यांना तेव्हा जितकी मते पडली साधारण तितकीच या 2024च्या निवडणुकीत पडलेली आहेत. तरी त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे मोंडेकर यांची मते जोरदारपणाने वाढलेली यावेळी दिसली. संग्राम यांचे पिताजी अनंतराव थोपटे भोरमधून एकदा अपक्ष तर नंतर पाच वेळा काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आमदार बनले. 1999मध्ये जेव्हा काँग्रेस फुटली व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली तेव्हा थोपटेंचा पराभव शरद पवारांच्या काशीनाथ खुटवड या उमेदवाराने करून दाखवला. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा थोपटेच आमदार बनले होते.

थोपटे पुणे जिल्ह्यातून राज्याच्या मंत्रीमंडळातही वजनदार मंत्री राहिले होते. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात ते सातत्याने शरद पवारांचे विरोधक म्हणूनच गणले जात होते. 1987-88मध्ये जेव्हा पवारांविरोधात काँग्रेसमध्ये जोरदार बंड रंगले होते तेव्हा थोपटे रामराव आदिकांसोबत बंडात होते. सुशिलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आदी बंडवाल्या मंत्र्यांप्रमाणेच थोपटे हेही बंडवाले होते. पण ते बंड फसले आणि नंतर पुन्हा शरद पवारांकडेच राज्याचे नेतृत्त्व राजीव गांधींना ठेवावे लागले. त्यानंतर थोपटे बाजूला पडू लागले. जेव्हा 1993मध्ये सुधाकरराव नाईकांना बाजूला करून  शरद पवार चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी थोपटेंचा त्यांनी जाणीवपूर्वक समावेश आपल्या मंत्रीमंडळात केला नव्हता. थोपटे व त्यांचे समर्थक तेव्हा अस्वस्थ झाले होते. भोरच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात थोपटे गरजले होते की सध्या आपण शांत राहतोय याचा अर्थ असा नव्हे की वेळ येताच आपण तलवारी बाहेर काढून मऱ्हाट्यांचा बाणा दाखवणारच नाही! हा त्यांचा पक्षश्रेष्ठी आणि पवारांना थेट इशाराच होता. त्यानंतर निवडणुकीत पवारांनी थोपटेंना आस्मान दाखवण्याची व्यवस्था केलीच. नंतर पुढच्या निवडणुकीत ते जरी विजयी झाले तरी मंत्रीमंडळात दिसलेच नाहीत.

थोपटे

2009ला अनंतरावांचे पुत्र संग्राम भोरचे काँग्रेसचे आमदार बनले. पण त्यांचा समावेश अशोक चव्हाण तसेच पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात झालाच नाही. 2014लाही ते आमदार बनले पण विरोधात बसावे लागले. त्या टर्ममध्ये विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस आमदारांत थोपटे अग्रेसर राहिले. 2017मध्ये सुधीर मुनगंटीवारांचे अंदाजपत्रकाचे भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. बजेटच्या प्रती सभागृहात फाडल्या तेव्हा संग्राम थोपटे यांना अन्य 17 आमदारांसह निलंबित केले गेले होते. असे लढाऊ थोपटे 2019ला मविआचे सरकार बनले तेव्हा काँग्रेसतर्फे मंत्रिमंडळात येतील अशी अटकळ होती. पण तसे झाले नाही. यावेळी थोपटेंचे कार्यकर्ते भाषणे करत बसले नाहीत. त्यांनी पूर्वी म्यान केलेल्या तलवारी बाहेर काढून  पुण्याच्या ऐतिहासिक काँग्रेस भवनावर थेट हल्लाच केला. मोडतोड केली. त्यावेळी बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्यांनी थोपटेंचा योग्य सन्मान पक्षात ठेवला जाईल असे सांगितले होते. संग्राम थोपटेंचे नाव नाना पटोले पायउतार झाले तेव्हा विधानसभा अध्यक्षपदासाठी व नंतर मंत्रीपदासाठी तसेच पक्षाचे प्रांताध्यक्षपदासाठीही अनेकदा घेतले गेले. पण ते कायम संभाव्यच राहिले.

आता ते आपली नाराजी पक्षाला भेट देऊन निघून जातील हे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक नेते काँग्रेसला सोडून गेले. अनंत गाडगीळांसारखे काही नेते हे पक्ष सोडून जरी गेले नसले तरी नाराज होऊन आतच कुढत राहिले आहेत. आता थोपटे भाजपाच्या उंबरठ्यावर आहेत. पण त्यांना पुढची निवडणूक भोरमधून भाजपाचे उमेदवार म्हणून लढता येईला का हा सवाल आहे. सध्याच्या जागावाटपात आता ती जागा अजितदादांकडेच जाणार हे उघड आहे. तिथे त्यांचा आमदार आलेला आहे. जर 2029च्या विधानसभेच्या निवडणुका पुन्हा महायुती म्हणूनच लढायचे भाजपाने ठरवले तर थोपटेंना कमळ चिन्हावर तिथे लढता येणार नाही. पण जर शतप्रतिशत भाजपा, असा नारा  दिला गेला तर मग थोपटेंना संधी असू शकते! अर्थातच पिढ्यानपिढ्या भोरच्या शेतकरी जनतेने हाताच्या पंजाला वा पवारांच्या घड्याळाला मते दिली आहेत. तिथे कमळ फुलणार का हा प्रश्नच आहे!

थोपटे

Continue reading

शासनाच्या वैधानिक समित्यांना धुळे प्रकरणाचे ग्रहण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा काही निवडक आमदारांना, राजकीय नेत्याने यशस्वी कसे व्हावे याचे एक गुपित सांगितले. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात वैधानिक समित्यांच्या एकत्रित उद्घाटन समारंभासाठी हे आमदार जमले होते. ते सारे विविध समित्यांचे सदस्य तसेच समितीप्रमुखही होते. फडणवीसांनी त्यांना...

शरद पवारांच्याच काळात सहकारी साखर कारखान्यांना घरघर!

देशातील साखर उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर आहे. साखरेचे उत्पादन तसेच ऊसाखालचे क्षेत्र यात उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. देशातील एकूण ऊसाखालच्या क्षेत्राच्या चाळीस टक्के क्षेत्र उत्तर प्रदेशातील आहे. महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर लागतो. देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी 28 टक्के क्षेत्र आपल्याकडे...

पंचायत, पालिकेतल्या ओबीसी प्रतिनिधींची संख्या घटणार?

भारत पाकिस्तान समरप्रसंग सुरु होण्याच्या अवघा एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेले. पण दुसऱ्याच दिवशी भारताने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली. आधी आपण पाकव्याप्त काश्मीरमधील आणि प्रत्यक्ष पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रे,...
Skip to content