दापोलीच्या तथाकथित रिसॉर्ट प्रकरणातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आता वांद्र्यातल्या अनधिकृत कार्यालयाच्या प्रकरणातूनही सहीसलामत बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री स्वतः म्हाडाच्या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे कळते.
आधी दापोलीचे रिसॉर्ट आणि नंतर माजी मंत्री अनिल परब यांनी वांद्रे येथील राहत्या घराजवळ अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. अनिल परब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय असल्याने या दोन्ही आरोपांना काहीशी धार प्राप्त झाली होती. रिसॉर्टबाबत ते परब यांच्या मालकीचे नसल्याचे निष्पन्न झाल्याने तो आरोप फुस्स झाला तसेच नुकतेच म्हाडानेही वांद्रे येथील परब यांच्या घराजवळ असलेल्या कार्यालयाशी परब यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट करून तसे लेखी पत्रही त्यांना दिले. त्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

असे असले तरी आज संध्याकाळी हाती आलेल्या माहितीनुसार या पत्रामुळे कोणी नाही परंतु उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संताप झाला असून त्यांनी एकदोन दिवसांत म्हाडाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मंत्रालयात पाचारण केले असल्याचे समजते. म्हाडाने दिलेले हे पत्रच कशाच्या आधारे दिले गेले हे जाणून घेण्यासाठी आणि ते रद्दबादल करण्याकरीता काय करता येऊ शकते हे चाचपण्यासाठी म्हाडाच्या विधि सल्लागारांही मंत्रालयातील बैठकीला बोलावले जाईल. काल केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणात लक्ष घालू शकले नाहीत. मात्र आजपासून ते या प्रकरणाची खोलात जाऊन माहिती घेणार आहेत, असे कळते.
या सर्व प्रकरणाला आणखी एक कंगोरा आहे तो म्हणजे परब राहतात ती इमारत ठाकरे यांच्या मातोश्री, या निवासस्थानापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या घराजवळील त्यांच्या कट्टर समर्थकाविरूद्ध आम्ही कशी कारवाई करतो ते पाहाच हे दाखवणेच यामागे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. असे काही होत असल्याचा सुगावा लागेल तेव्हा मुलुंड येथील नीलम नगर परिसरातही हजारोंनी जमण्याचे निरोप शिवसैनिकांना गेल्याचे समजते.

