नव्या संसद भवनाची गरज आहे का, असा प्रश्न देशाच्या संवैधानिक संस्था व पदाविरूद्ध रोज सकाळी गरळ ओकणारे संजय राजाराम राऊत यांनी केला आहे. तुमचे मालक उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या पैशाने नवी मातोश्री, मातोश्री – २ बांधली. त्याची गरज होती का, जुन्या मातोश्रीत ते का नाही राहत, याचे उत्तर प्रथम त्यांनी द्यावे आणि नंतर नव्या संसद भवनाबद्दल प्रश्न विचारावे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
देशाला कायम अस्थिर ठेवायचा प्रयत्न जसा शहरी नक्षली करतात त्याच दिशेने संजय राऊत यांचा प्रवास चालू आहे. येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण होत आहे. त्यावर राऊत टीका करत आहेत. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष असताना तेव्हाच्या एनडीएने, ज्यामध्ये उद्धव ठाकरेही होते, एकमताने ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अशा सर्व देशांत मोदींना जो मान मिळतोय ते यांना बघवत नाही. त्यामुळे राऊतसारखे नमकहराम, देशद्रोही अशी टीका करत आहेत. तुमचे मालक अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. पण, स्वतःच्या वडिलांचे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधू शकले नाहीत. आज मोदी देशाला बहुमान मिळवून देतात तर यांना मिरच्या झोंबतात, असेही ते म्हणाले.
आज याच राऊत यांनी त्यांच्या मुखपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाजूने अग्रलेख लिहिला आहे. यांनी अजित पवार यांच्या बाजूने कधी अग्रलेख लिहिला नाही. उलट, भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी ते बॅगा भरून तयार आहेत, असे त्यांनी लिहिले. जयंत पाटील आणि अजितदादांमध्ये काड्या घालण्याचा हा प्रयत्न आहे. आजित पवार कधी राष्ट्रवादी सोडतात आणि आपण तेथे घुसतो, असा यांचा प्रयत्न आहे. लोकसभेसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याकरीता ते प्रयत्नशील आहेत, असा गौप्यस्फोटही नितेश राणे यांनी केला.
हेच राऊत नवाब मलिकचे कौतुक करतात. बाळासाहेबांच्या जिवावर उठलेल्या दाऊदच्या हस्तकांबरोबर संबंध ठेवणारे नवाब मलिक, यांची तुम्ही बाजू घेता? जयंत पाटील यांच्यावर भाजपा प्रवेशासाठी दबाव आणला जातोय असा आरोप करता. श्रीधर पाटणकर काही महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहिले. त्यांच्याविरोधातली कारवाई चालू आहे का? त्याबद्दल लिहा ना.. मग मालक कसे हाकलतात ते कळेल. तुमच्या मालकांनी सचिन वाझेला मांडीवर घेतले होते. तो ओसामा बिन लादेन आहे का, असा सवाल केला होता. याच वाझेला घेऊन तुमच्या मालकांचे चिरंजीव आणि भाचे लंडनमध्ये कोणत्या नेत्याच्या घरी उतरले होते, कशासाठी उतरले होते, ते जाहीर करा. फोटो दाखवू का, असा सवालही त्यांनी केला.
काल आदित्य ठाकरे नागपूरला प्रकल्पग्रस्तांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत एक सराईत गुंड होता. तुम्हाला सोबत गुंडच का लागतात, उद्धव ठाकरेंनाही गुंडच सोबत लागतात, कशाला? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महिला नसल्याबद्दल टीका करणाऱ्यांनी कर्नाटकात नुकत्याच स्थापन झालेल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये किती महिला आहेत, हेही जाहीर करावे, असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

