Homeपब्लिक फिगरउद्धव ठाकरे घालतात...

उद्धव ठाकरे घालतात राहुल गांधींसमोर लोटांगण!

सोनिया-मनमोहन सरकारच्या काळात पाकिस्तानातून दहशतवादी येऊन बॉम्बस्फोट करून जात होते, तेव्हा काँग्रेसची वोट बँक सांभाळण्यासाठी मौनीबाबा मनमोहन सिंग दिल्लीत मौन धारण करून बसत होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर दहा दिवसांतच मोदींनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा नायनाट केला. छत्तीसगढमध्ये नक्षल्यांचा सफाया झाला. 29 नक्षलवादी ठार झाले, तेव्हा राहुल गांधी त्यांच्या बचावासाठी पुढे आले. ज्यांनी शेकडो निरपराधांचा जीव घेतला, त्यांचा बचाव करणाऱ्या राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे लोटांगण घालतात, ही शरमेची बाब आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काल केला.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आ. नितेश राणे, आ. शेखर निकम, किरण सामंत, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी यावेळी उपस्थित होते.

हिंमत असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधले गेले ही चांगली गोष्ट झाल्याची जाहीर कबुली द्या, असे आव्हान देत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे दाखवू शकत नसतील, तर नकली शिवसेनादेखील त्यांनी चालवू नये, असे ते म्हणाले.

तिहेरी तलाक, कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहात का, हेही उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे. काँग्रेसची वोट बँक हीच उद्धव ठाकरेंची वोट बँक आहे हे माहीत असल्याने अशी कबुली देण्याची हिंमत ते दाखविणार नाहीत. तिहेरी तलाक पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या, 370 कलम पुन्हा लागू करण्याची ग्वाही देणाऱ्या, मुस्लिम पर्सनल लॉ पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे की नाही, हे जाहीर करा. मौन पाळू नका, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असा सहज मिळत नसतो. तुम्ही केवळ त्यांच्या पोटी जन्म घेतला. पण वारसा मात्र नारायण राणे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे चालवत आहेत. तुम्ही त्या वारशाचा केव्हाच त्याग केलात. इंडी आघाडी ही एकप्रकारे औरंगजेब फॅन क्लब झाली आहे. त्यामुळे या फॅन क्लबसोबत जायचे, की मोदींसोबत राहायचे याचा निर्णय रत्नागिरीकरांनी करायला हवा, असे आवाहनही शाह यांनी केले.

नारायण राणे यांच्यासाठी दिलेले एक-एक मत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविणारे व देशाला समृद्ध करणारे ठरणार आहे. देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर सोडून काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग पायउतार झाले. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. मोदींना पंतप्रधान बनविणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणे, देशाच्या सुरक्षिततेची हमी मिळविणे आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणार ही मोदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे ज्यांच्याबरोबर जाऊन बसले आहेत, त्या सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी 70 वर्षांपासून अनाथ अपत्यासारखे 370 कलमास कवटाळले होते. 370 कलम रद्द केल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे राहुल गांधी म्हणाले होते. पाच वर्षे झाली. काश्मीरमध्ये रक्ताचा एक थेंबही सांडलेला नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्या पायाशी लोळण घेतली ते काँग्रेस व शरद पवार कलम 370 रद्द करण्यास विरोध करत होते. जे शरद पवार आणि राहुल गांधींसमोर लोटांगण घालतात, ते महाराष्ट्राचा सन्मान सांभाळू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content