टाळ-चिपळ्या, मृदुंग, ढोल, हार्मोनियम यांच्या सुरावटींवर विठूनामाच्या गजरात त्रिपुरा नगरी नुकतीच दुमदुमली. याचे निमित्त होते, तेथे शुक्रवारी सुरू झालेले अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन.
त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या छोट्या वारकऱ्यांची दिंडी लक्षवेधी ठरली. उज्जयंता पॅलेस ग्राऊंड ते रवींद्र शताब्दी भवन असे मार्गक्रमण करणाऱ्या या शोभायात्रेत विठूनामाच्या भक्तीरसात न्हाहलेल्या वारकऱ्यांनी गोल रिंगणही सादर केले. या शोभायात्रेला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

उद्घाटन कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी कृष्णगीतावर आधारित नृत्याविष्काराद्वारे जागर केला. पांढऱ्या पेहरावातील या अध्यात्मिक शांतीदूतांनी आपल्या कुशल सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन आणि इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ही शोभायात्रा काढण्यात आली होती. शांती काली आश्रमाचे महंत चित्त महाराज यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत मान्यवर साधु-संत, अभ्यासकांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

या शोभायात्रेत ईशान्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ‘भक्तीसंगम’ पाहायला मिळाला. ईशान्येकडील राज्यांमधील पारंपरिक नृत्यप्रकारांचाही यात समावेश होता.

