Homeपब्लिक फिगरकेंद्राकडून हस्तक्षेप झाल्यास...

केंद्राकडून हस्तक्षेप झाल्यास ‘फटाक्यांची माळ’ लागेल..

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ (एँटिलिया) स्फोटके भरलेली गाडी ठेवण्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कसून चौकशी करावी. अशी चौकशी झाल्यास येथे ‘फटाक्यांची माळ’ लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत केले.

मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मधुर संबंध आहेत. ठाकरे यांच्या शपथविधीच्या वेळीही अंबानी सहकुटूंब उपस्थित होते. मग वाझे, अंबानी यांच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याची हिम्मत दाखवेल का? अंबानी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत इस्त्रायली लोक आहेत. इस्त्रायली यंत्रणा काय असते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्या पलीकडे मध्य प्रदेशचे पोलीस आहेत. ते कसे येथे आले ते माहित नाहीत, पण आहेत. येथे इतकी सुरक्षा असते की, या रस्त्यावरून एखादा माणूस दोन वेळा जरी गेला तर त्याची चौकशी होते. मग, येथे तर २४ तास गाडी उभी होती आणि कोणाच्या लक्षात आले नाही? , असा सवाल त्यांनी केला.

या गाडीत एक पत्र मिळते. त्यात नीता भाभी, मुकेश भैय्या, असा आदरार्थी उल्लेख होतो. कोणीतरी गुजराती हिंदी बोलतो, तसा सारा प्रकार होता. गुडनाईटचे स्पेलिंगही चुकीचे होते. पैसे काढण्यासाठी पोलिसांनी असे केले तर हा चुकीचा समज आहे. मुकेश अंबानींकडून असे पैसे काढणे सोपे आहे का? आणि कुणी पोलीस असा प्रयत्न करून राहू शकतो का? पोलीस  आयुक्त परमबीर सिंह यांची बदली का केली, याचे कारण अद्याप देण्यात आलेले नाही. जर त्यांचा या प्रकरणाशी संबंध होता तर मग त्यांची चौकशी का केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

पूर्वी बॉम्ब ठेवण्याचे काम अतिरेकी करायचे. आता पोलीस असा प्रकार करू लागले. ही भारताच्या इतिहासातली पहिली घटना असावी. जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला आता पोलिसांना भाग पाडले जात आहे. वाझे किंवा परमबीर सिंह, कोणी सांगितल्याशिवाय असा बॉम्ब ठेवण्याचा प्रकार करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारकडून याचा तपास होऊच शकत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कसून तपास करावा. तसे झाले नाही तर येथे अराजक माजायला वेळ लागणार नाही. राष्ट्रपती शासन वैगेरे गोष्टी राजकीय झाल्या. मला राजकीय गोष्टींपेक्षा या घटनेची कसून चौकशी महत्त्वाची वाटते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या इतर प्रश्नही उचल खात आहेत. कोरोनाचे तर विचारूच नका. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट गेले आहे. बेरोजगारीचा आकडा फुगत आहे. नोकऱ्या गेल्यामुळे २० हजार अडमिशन्स होऊ शकल्या नाहीत. अशा साऱ्या स्थितीत एक माजी पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवरच १०० कोटी मागितल्याचा आरोप करतात, याने आपल्याला लाज वाटली, असेही राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतून १०० कोटी मग बाकीचे..

परमबीर सिंह यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला. देशाच्या इतिहासातली ही पहिली घटना असावी. परमबीर सिंह यांना येऊन एक वर्ष झाले असेल. महिन्याला १०० कोटी म्हणजे वर्षाचे १२०० कोटी. लॉकडाऊन, हॉटेल्स बंद, यामुळे कदाचित इतके गोळा झाले नसतील. पण एका शहरातून १०० कोटी, मग महाराष्ट्रात शहरे आहेत किती? तिथल्या कमिशनरांना काय सांगितले, हेही पाहवे लागेल. त्यामुळे देशमुख यांचा नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांचीही कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सचिन वाझेला शिवसेनेत आणले कुणी?

ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझे १७ वर्षे निलंबित होता. त्यानंतर त्याला पोलिसांत पुन्हा घ्यावा म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्याला वारंवार सांगितल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या काळात हा शिवसेनेत होता. त्याला शिवसेनेत नेला कोणी, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content