Homeपब्लिक फिगरकेंद्राकडून हस्तक्षेप झाल्यास...

केंद्राकडून हस्तक्षेप झाल्यास ‘फटाक्यांची माळ’ लागेल..

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ (एँटिलिया) स्फोटके भरलेली गाडी ठेवण्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कसून चौकशी करावी. अशी चौकशी झाल्यास येथे ‘फटाक्यांची माळ’ लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत केले.

मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मधुर संबंध आहेत. ठाकरे यांच्या शपथविधीच्या वेळीही अंबानी सहकुटूंब उपस्थित होते. मग वाझे, अंबानी यांच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याची हिम्मत दाखवेल का? अंबानी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत इस्त्रायली लोक आहेत. इस्त्रायली यंत्रणा काय असते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्या पलीकडे मध्य प्रदेशचे पोलीस आहेत. ते कसे येथे आले ते माहित नाहीत, पण आहेत. येथे इतकी सुरक्षा असते की, या रस्त्यावरून एखादा माणूस दोन वेळा जरी गेला तर त्याची चौकशी होते. मग, येथे तर २४ तास गाडी उभी होती आणि कोणाच्या लक्षात आले नाही? , असा सवाल त्यांनी केला.

या गाडीत एक पत्र मिळते. त्यात नीता भाभी, मुकेश भैय्या, असा आदरार्थी उल्लेख होतो. कोणीतरी गुजराती हिंदी बोलतो, तसा सारा प्रकार होता. गुडनाईटचे स्पेलिंगही चुकीचे होते. पैसे काढण्यासाठी पोलिसांनी असे केले तर हा चुकीचा समज आहे. मुकेश अंबानींकडून असे पैसे काढणे सोपे आहे का? आणि कुणी पोलीस असा प्रयत्न करून राहू शकतो का? पोलीस  आयुक्त परमबीर सिंह यांची बदली का केली, याचे कारण अद्याप देण्यात आलेले नाही. जर त्यांचा या प्रकरणाशी संबंध होता तर मग त्यांची चौकशी का केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

पूर्वी बॉम्ब ठेवण्याचे काम अतिरेकी करायचे. आता पोलीस असा प्रकार करू लागले. ही भारताच्या इतिहासातली पहिली घटना असावी. जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला आता पोलिसांना भाग पाडले जात आहे. वाझे किंवा परमबीर सिंह, कोणी सांगितल्याशिवाय असा बॉम्ब ठेवण्याचा प्रकार करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारकडून याचा तपास होऊच शकत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कसून तपास करावा. तसे झाले नाही तर येथे अराजक माजायला वेळ लागणार नाही. राष्ट्रपती शासन वैगेरे गोष्टी राजकीय झाल्या. मला राजकीय गोष्टींपेक्षा या घटनेची कसून चौकशी महत्त्वाची वाटते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या इतर प्रश्नही उचल खात आहेत. कोरोनाचे तर विचारूच नका. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट गेले आहे. बेरोजगारीचा आकडा फुगत आहे. नोकऱ्या गेल्यामुळे २० हजार अडमिशन्स होऊ शकल्या नाहीत. अशा साऱ्या स्थितीत एक माजी पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवरच १०० कोटी मागितल्याचा आरोप करतात, याने आपल्याला लाज वाटली, असेही राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतून १०० कोटी मग बाकीचे..

परमबीर सिंह यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला. देशाच्या इतिहासातली ही पहिली घटना असावी. परमबीर सिंह यांना येऊन एक वर्ष झाले असेल. महिन्याला १०० कोटी म्हणजे वर्षाचे १२०० कोटी. लॉकडाऊन, हॉटेल्स बंद, यामुळे कदाचित इतके गोळा झाले नसतील. पण एका शहरातून १०० कोटी, मग महाराष्ट्रात शहरे आहेत किती? तिथल्या कमिशनरांना काय सांगितले, हेही पाहवे लागेल. त्यामुळे देशमुख यांचा नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांचीही कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सचिन वाझेला शिवसेनेत आणले कुणी?

ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझे १७ वर्षे निलंबित होता. त्यानंतर त्याला पोलिसांत पुन्हा घ्यावा म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्याला वारंवार सांगितल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या काळात हा शिवसेनेत होता. त्याला शिवसेनेत नेला कोणी, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content