Homeब्लॅक अँड व्हाईटसमाजात द्वेष निर्माण...

समाजात द्वेष निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न!

आज कोल्हापूर बंद आहे. कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या. त्याआधीसुध्दा वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून समाजासमाजामध्ये अंतर पाडण्याचे काम किंवा द्वेष निर्माण करण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

अलीकडच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल कुणाचे, कुठे गेले आहेत. व्हॉटस्ॲपवर काय बातम्या आल्या आहेत. कुणी व्हायरल केले आहे. हे तपासायचं म्हटलं तर तपासता येतं. परंतु या गोष्टीचा छडा लागलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राज्यकर्त्यांची असली पाहिजे आणि पोलीस खात्याचे काम करणार्‍या अधिकारीवर्गाची असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

कालच कोल्हापूरमध्ये पोलिसांना आणि मिडियाला तिथल्या लोकांनी आंदोलन करत असताना कोल्हापूर बंद करणार असे सांगितले होते. वास्तविक त्याच्या आधी पोलिसांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन किंवा अशाप्रकारच्या घटना घडतात त्यावेळी शांतता कमिटी असते किंवा स्वयंसेवी संस्था काम करणाऱ्या असतात त्या-त्या शहरात, तालुक्यात, जिल्हा ठिकाणी पोलीस यंत्रणा असते त्यांना कुणाला एकत्र घेतल्यानंतर नीटपणे हाताळता येईल ही इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असते. फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि सरकारचा त्यांना क्लीअर आदेश असला पाहिजे की हे घडू द्यायचे नाही असेही अजित पवार म्हणाले.

वेगवेगळ्या जाती, धर्म, पंत हे सगळेजण यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र कुठल्या जातीने, पंथाने एखाद्याचा द्वेष करा असे सांगितले नाही परंतु वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी व सत्तेत आल्यावर ७५ हजार नोकरभरती करू या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता आल्या नाहीत त्यामुळे जाणीवपूर्वक कुणी खतपाणी घालतंय का? याचा मास्टरमाईंड कोण आहे? कोण हे करण्यासाठी प्रोत्साहित करतंय? या सगळ्याचा छडा लावण्याचे काम पोलीस खात्याने केले पाहिजे, असे पवार म्हणाले.

औरंगजेबाचे समर्थन करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्याला कोण समर्थन देईल? त्यामुळे याला वेगळया प्रकारचे स्वरूप देऊ नका. अफजलखान असेल औरंगजेब असेल कुणीही त्यांचे समर्थन करणार नाही. अशाप्रकारच्या बातम्या पसरवून लोकांच्या मनात गैरसमज पसरवून समासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम होता कामा नये. जातीय सलोखा टिकवला गेला पाहिजे. गेले कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने आपण राहतोय. त्याला कुठेही डाग लागता कामा नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content