महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित आघाडी करत लढवण्यासाठी सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडी आपापल्या तयारीला लागली असून आज यादृष्टीने दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या बैठका झाल्या.
आज दुपारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. उद्या इंडिया आघाडीची राज्यस्तरीय बैठक होत असून यामध्ये काँग्रेस, शिवसेना (उबाठा) तसेच राष्ट्रवादी (शप) गटाच्या वाट्याला किती जागा असाव्यात यादृष्टीने आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. याच बैठकीत हे तिन्ही प्रमुख पक्ष 48पैकी प्रत्येकी 16 जागा लढवण्याच्या मनःस्थितीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
संध्याकाळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांच्या समन्वय समितीतल्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे नेते आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, आजच्या बैठकीत एनडीएच्या मागे झालेल्या बैठकीनुसार, पुढील चर्चा करण्यात आली. राज्यात लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा महायुतीतर्फे घटक पक्षांसह एकत्रित लढवण्याच्या दृष्टीने तसेच त्यापैकी किमान ४५ जागा जिंकण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला.
यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्व पक्षांची एक सर्वसमावेशक, सर्वव्यापी अशी समन्वय समिती असेल. ही समिती तेथील उमेदवाराच्या नावावर तसेच एकूण व्यूहरचनेवर विचार करेल. त्यावर अंतिम निर्णय महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील. याच लोकसभा निवडणुकीच्याबरोबरच राज्यात किमान विधानसभेच्या किमान २०० जागा जिंकायच्या यादृष्टीने विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे विधिमंडळातील सर्व समित्या, त्यावरील नावे, प्रत्येक पक्षाचा कोटा, समित्यांची विभागणी यावरही विस्तृत चर्चा झाली. यावर अंतिम निर्णय आमचे नेते घेतील, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते दादा भुसे तसेच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे याप्रसंगी उपस्थित होते.

