छात्रसैनिकांमध्ये नागरी जबाबदारी आणि नेतृत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सैनिकी शाळांद्वारे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सर्व सैनिकी शाळांमध्ये प्रीफेक्टोरियल प्रणालीचे पालन केले जाते. यात नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी छात्रसैनिकांना विशिष्ट जबाबदाऱ्या नेमून दिल्या जातात. सैनिकी शाळांचे प्राथमिक उद्दिष्ट, छात्रसैनिकांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी काल राज्यसभेत लेफ्टनंट जनरल (डॉ) डी. पी. वत्स (निवृत्त) यांना लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.

सैनिकी शाळा गेल्या काही वर्षात छात्रसैनिकांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण, चांगले नागरिक होण्यासाठी व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सरसता साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांना तयार करण्यामध्ये एक प्रारूप म्हणून विकसित होत आहेत.

छात्रसैनिकांना नागरी जबाबदाऱ्या समजण्यासाठी आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी सैनिकी शाळा आणि इतर शाळांमध्ये आयोजित केल्या जाणार्या विविध आदानप्रदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
सैनिकी शाळा सामाजिक कार्य आणि सामुदायिक सेवा प्रकल्प हाती घेतात. छात्रसैनिकांना विविध वातावरण आणि परिस्थितींबद्दल अवगत करण्यासाठी शैक्षणिक दौरे आणि भेटींचे आयोजन केले जाते. अनुकूलता, सांस्कृतिक समज आणि मोठ्या समुदायाप्रती जबाबदारीची भावना विकसित करण्यात हे अनुभव सहायक ठरतात.

मुले आणि मुली दोन्ही कॅडेटसाठी एनसीसी अनिवार्य आहे. यामुळे कॅडेट्समध्ये चारित्र्य, धैर्य आणि शिस्त या गुणांचा विकास होण्यास मदत होते.