Homeमुंबई स्पेशलघ्या वदवून राहुल...

घ्या वदवून राहुल गांधींकडून माफी!

ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि याच शहरात त्यांचा मुलगा, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जमलेले किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार, असे सवाल आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर तसेच मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

लालुप्रसाद यादव, समाजवादी पक्ष, काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. हा बाळासाहेबांच्या विचारांविरोधात दगा आहे. INDIA आघाडीच्या नेत्यांनी बैठकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना खा. गजानन कीर्तिकर यांनी हे सर्व पक्ष घराणेशाहीचा परिपाक असल्याचा आरोप केला. या आघाडीत सामील झालेल्या पक्षांपैकी १७ पक्ष घराणेशाही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना देशाच्या विकासाची काहीच पडलेली नाही, असे ते म्हणाले.

राहुल

उद्धव काँग्रेसच्या ताटखालचं मांजर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेला विरोध केला. एक वेळ पक्ष विसर्जित करेन, पण काँग्रेससोबत जाणार नाही, अशी भूमिका आयुष्यभर घेतली. उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर बनले आहेत. स्वा. सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी करावं, हे दुर्दैवी आहे. कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या समाजवादी पक्षासोबत, राम मंदिरासाठी निघालेली रथयात्रा अडवून अडवाणींना अटक करणाऱ्या लालुप्रसाद यादवांसोबत आणि उद्दाम व्यक्तिमत्त्वाच्या राहुल गांधींसोबत उद्धव यांनी बसावं हे वाईट आहे, अशी टीकाही खा. कीर्तिकर यांनी केली.

… तर उद्धव यांनी युती तोडली असती?

उद्धव ठाकरे यांनी केवळ स्वत:ला मुख्यमंत्रीपद मिळावं, म्हणून या सर्व कोलांटउड्या मारल्या. भाजपने त्यांना पाच वर्षं मुख्यमंत्रीपद देऊ केलं असतं, तर त्यांनी युती तोडली असती का, या प्रश्नाचं उत्तर उद्धव यांनी द्यावं. निवडणुकीनंतर उद्धव मोदींना भेटले होते. आपल्या युतीचा विजय झाल्याने आपलीच सत्ता येईल, एवढी बोलणी झाली होती. पण नंतर मुख्यमंत्रीपदामुळे त्यांची मति फिरली, असा घणाघात केसरकर यांनी केला. २०१४मध्ये न मागता शरद पवार यांनी भाजपला स्थिर सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता. आताही पवार साहेबांनी स्थिर सरकारासाठी आमच्यासोबतच यावं, असंही ते म्हणाले.

राहुल

उद्धव यांना आव्हान

मुंबईत सत्तेच्या मिषाने एकत्र आलेल्या या पक्षांपैकी अनेकांनी बाळासाहेबांचा सतत विरोधच केला. उद्धवना या सर्वांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी या सर्वांना घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकावर जावं. तिथे जाऊन या सर्वांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करायला लावावं, असं खुलं आव्हान शिवसेना पक्षातर्फे दीपक केसरकर यांनी दिलं.

नव्या बाटलीत जुनी दारू

काँग्रेसने UPAच्या काळात अमाप भ्रष्टाचार केला. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर त्यांचा हा भ्रष्टाचार उघडा पडला. त्यामुळे UPA हे नाव घेऊन लोकांसमोर गेलो, तर लोक नाकारतील, ही भीती काँग्रेसला वाटते. त्यामुळे त्यांनी INDIA हे देशाचं पवित्र नाव धारण करत ही भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधली आहे. पण नाव बदललं, तरी आतली माणसं तीच आहेत. हे म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू भरण्यासारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राहुल

जनतेने तुम्हाला नाकारलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू झाली आणि त्यात तुमच्यापैकी काहींची चौकशी झाली, तर ती लोकशाहीविरोधी कारवाई नसते. देशात लोकशाही नसती, तर इतर राज्यांमध्ये तुमची सरकारं कशी आली असती, असा सवालही दीपक केसरकर यांनी विचारला. देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. सामान्य माणूस सुखी होत आहे आणि तुम्हाला आता लोकशाहीचा पुळका आला आहे. पण देशाने, देशातल्या लोकांनी तुमच्या भ्रष्ट आघाडीला नाकारलं आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदीच सक्षम नेतृत्त्व

हे विरोधक सत्तेत आल्यावर चीनला अरुणाचल प्रदेशातून मागे ढकलण्याची भाषा करतात. पण ते त्यांना शक्य नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याएवढं सक्षम नेतृत्त्व या लोकांकडे नाही. मोदींच्या काळात देशाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. पूर्वी आपल्या देशात शस्त्रास्त्र तयार होत नव्हती. आता आपण त्या आघाडीवरही सक्षम झालो आहोत. आज जगभरातील देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या गुंतवणुकीतून रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळेच या विरोधकांना रोजगाराचा मुद्दा आता आठवला, असंही ते म्हणाले.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content