रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात तर कुणी सैन्यात! तर अशा या मोऱ्यांच्या वस्तीत जगन्नाथ झिमजीराव मोरे १२ मार्चपर्यंत राहत होते. १२ मार्च रोजी चिपळूण येथील लाईट हेल्थ केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८० वर्षांचे होते. जगन्नाथराव सैन्यात असल्याने आपली तब्येत सांभाळून होते. त्यांच्या अचानक मृत्यूच्या बातमीने त्याच्या जवळच्या नातेवाईकांना धक्काचं बसला. मृत्यूच्या चारपाच दिवस आधीच काही नातेवाईकांशी त्यांचे फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांना काही आजार असल्याचे सांगितले नव्हते, असे एका नातेवाईकांनी या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.
पार्थिव काळेनिळे पडलेले
चिपळूणहुन पार्थिव सणघर येथे आणून जगन्नाथराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अंत्यसंस्काराची तयारी करत असताना ग्रामस्थांना पार्थिव देह बराचसा काळानिळा पडलेला दिसत होता. मात्र त्यांचा मुलगा दीपक याचा रागीट स्वभाव लक्षात घेता सर्वजण चूप बसले. आजूबाजूच्या घरात चौकशी केली असता प्रथम कुणी बोलण्यासच तयार होत नव्हते. कारण त्यांचा मुलगा दीपक हा त्या गावचा माजी सरपंच होता, असे कळले. शिवाय तो अतिरागीट असल्याने त्या घराची वाटच कुणी धरतं नसे. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंदाजे दोन किंवा तीन तारखेला मोरे यांच्या घरातून जोरदार भांडणाचे व मारहाणीचे आवाज येत होते, अशी कुजबुज गावात सुरु हॊती. दीपक याने वडिल जगन्नाथराव यांना वाटेल तसे बदडले व त्यातच ते काही काळ बेशुद्धही पडले होते असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका नातेवाईकाने सूचित केले.
त्यानंतर आठवडाभर घरीच उपचार करून पाहिले. पण प्रकृतीत उतार पडत नव्हता. अखेर कळबणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा विचार झाला. तेथे रुग्णाला घेऊनही गेले होते. मात्र कळबणी रुग्णालयाने रुग्णाच्या शरीराची पाहणी करून त्यांच्या शरीरावर व्रण व इजा झाल्याच्या खुणा कसल्या आहेत याची विचारणा केल्यावर दीपकची बोबडीच वळली! त्यातच रुग्णाला दाखल करून घेतल्यावर पोलिसांना कळवू व रीतसर पोलीस केस झाल्यानंतर उपचार सुरु होतील असे रूग्णालयाने स्पष्ट केल्यानंतर त्याने तो नाद सोडून दिला. अखेर कुणाच्या तरी ओळखीने चिपळूणच्या लाईट हेल्थ केअर रुग्णालयात जगन्नाथरावांना दाखल केले गेले. परंतु तोवर बराच वेळ गेल्याने त्यांचे निधन झाले.
वादग्रस्त सरपंच
दीपक मोरे हे त्या गावातील वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. ते सरपंचपदी असताना. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी होऊन त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली असून याप्रकारणीचा खटला प्रलंबित आहे असेही समजले. इतकेच नव्हे तर खेड पोलीसठाण्यात कलम ३०४ व ४२० अन्वये गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून कसून चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

